जी... हां...मै... हूँ ...खलनाय
जी... हां...मै... हूँ ...खलनाय


जी... हां...मै... हूँ ...खलनायक....!
तासगाव. विनायक कदम.
मैं भी शराफत से जीता मगर , मुझको शरीफों से लगता था डर...!
सबको पता था मैं कमजोर हूँ , मैं इसलिए आज कुछ और हूँ....!
नायक नहीं खलनायक हूँ ... जुलमी बडा दुखदायक हूँ मै....
प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 1993 ला आलेल्या 'खलनायक' या चित्रपटातील हे गीत... त्यातल्या वेदना आमच्या तासगांवच्या 'चरण्या महादू पवार ऊर्फ चरण्या पारधी' याच्याशी अगदी मिळत्या जुळत्या वाटल्या. चरण्या... तासगांव तालुक्यातील अगदी फेमस नाव.. कुणी समाजसेवक, पुढारी, अधिकारी किंवा तथाकथित प्रतिष्ठित माणूस म्हणून नाय; तर गुन्हेगार म्हणून सर्वांच्या परिचयाचा..! एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातावर, "तुझा बाप चोर आहे." आसं गोंदवल्यालं हुतं..! अगदी तसंच... चरण्याच्या कुटुंबाच्या कपाळी चोर आणि गुन्हेगारीची मुंडावळ्यागत बांधलेली पट्टी, मातीत जाऊपर्यंत पाठ सोडत न्हाय. आता पोलीसांसह काही प्रतिष्ठित मंडळींनाही वाटंल... "ह्यो आता गुन्हेगारांवर लिहून त्यांचं उदात्तीकरण कराय लागलाय. ती कायमचीच चोर हायती, कधीच सुधारणार न्हायत." पण कुणीच जन्मजात चोर नसतो. सभोवतालची परिस्थिती व समाज त्याला तसं वागायला भाग पाडतो.
चरण्या पारधी...! या नावाचं गूढ माझ्या मनात अनेक दिवस घोळत हुतं. त्यो कसा आसंल, त्याचं घर, त्याची बायका-पोरं, त्याचं राहणीमान, रोजचा दिनक्रम, चोऱ्या, गुन्हेगार म्हणून त्याचा कायम पाठलाग करणारी त्याची ओळख... हे सगळंच जाणून घ्यायचं हुतं..! बातमीदार म्हणून आमची पोलीस स्टेशनची वारी कायमची ठरल्याली.! या ना त्या कारणानं पोलीस स्टेशनला जायालाच लागतंय. एकेदिवशी पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथं कसलातरी गोंधळ चालू हुता. 'चरण्या'च्या कुणीतरी चोरी केली हुती. त्यला पोलीसांनी उचललं हुतं. गुन्हा दाखल करायचं चाललं हुतं. "आमच्या पोरानं चुरी किली न्हाय." आसं म्हणत चरण्या दिवसभर पोलीस स्टेशनच्या आवारात घुटमळत हुता. सोबत त्याच्या बायका, कंबरंला चड्डी आणि पायात पायतान नसणारी पोलीस स्टेशनमधी निडरपणानं घुसणारी शेम्बड्या नाकाची बारकी पोरं.! बायकाबी गड्यागत डोसक्याला टापर बांधून उभ्या हुत्या. तारीख असल्याव तर कोर्टासमोर कायम घोळक्यानं बसलेल्या त्याच्या बायका दिसायच्या. बोलता बोलता त्यांच्यातच भांडणाची जुपी व्हायची. कुठल्या वेगळ्याच भाषेत बायका बायकात शिव्यांच्या लाखोल्या एकमेकांना व्हायच्या. बघणाऱ्याला कायच कळायचं न्हाय. मार म्हणाल तर रक्त आल्याशिवाय भांडण थांबत न्हाय. त्यापेक्षाही लोड झालं तर कापडं काढून, उघडं होत हाणामारी व्हायची.
लांबूनच चरण्या बद्दल ऐकलेलं. बराच दिवस मनात घोळत हुतं... भेटावं कधीतरी, त्याचं जगणं काय हाय, बघावं एकदा.! आमचे मित्र निवास बापू धोत्रे यांनी चरण्याला भेटवायची जबाबदारी घेतली. मग काय... गाठली इंदिरानगर झोपडपट्टी. तिथं त्याचा पोरगा भेटला. "चरण्या कुठाय?" विचारताच वरच्या घरात आसंल म्हणून सांगितलं. वन विभागाच्या कार्यालयाजवळ चरण्याचं तीन पत्र्याचं पाल हुतं. नेटानं वारं सुटलं तर उडून जाईल आसलं...! गाडी थांबली. चरण्या बाहेर कुठंतरी गेल्याचं समजलं. कोणतर येगळं आलंय म्हणून आमच्या गाडीच्या दिशेनं पाच-सात बायका, त्यांची पोरं आणि इंदिरानगर झोपडपट्टीतनं मोटरसायकलीवरनं जीवडी बसत्याल तीवडी माणसं आली. त्यांनी आमाला गराडाच घातला. निवास बापूनं सांगितलं,"ह्यो तलाठी हाय सातबाऱ्याव तुमची नावं घालायची हायती. बोलवा चरण्याला.!" मग फोना, फोनी झाली आणि 15 मिनटात गाडीवरनं दोघांच्या मधी बसल्याला चरण्या पांढऱ्या पोत्यातनं कायतरी घिऊन आला. पोतं पोरांच्याकडं दिलं आणि चरण्या आमच्याकडं आला. वळख, पाळख झाली. "या की... बसूया." म्हणला. दारात आसल्याली लोकांडी खाट, वज्यानं पार वाकून गिलती. त्यावर लुंगीचा फाटका धडूता त्यानं टाकला आणि आमाला बसायला सांगितलं. खाटंव मी आणि चरण्या, आन् दोघांच्या भोवती कुड घातल्यागत त्याचा सारा गोतावळा. अगदी जलीकट्टू खेळात पोरांनी घोळका करून बैल धरावा तशी माझी अवस्था..!
चरण महादू पवार (वय 65), शिक्षण दुसरी. चरण्या मूळचा आमणापूरचा. पण पारध्यासनी कोण लय दिवस ठिऊन घेतंय व्हय.. ज्यांन त्यानं चोरीचा आळ घ्यायचा आणि गावातनं ताणून लावायचं. चरण्याला 7 बायका त्यातल्या 2 मेलेल्या. 8 पोरं, 13 पोरी आणि नातू-नाती 60. एवढं मोठ्ठं कुटुंब..! कुटुंब नियोजनाचा काय विषयच येत न्हवता. पोटापाण्याचं काय म्हणला... तर मंगला बनसोडेच्या तमाशात त्याच्या 8 नाती व 2 नातू नाचायला जातात. सात महिनं काम असतं. त्यांच्या जिवावर ह्यांनी बसून खायाचं. उरलेल्या वेळात भीक मागायची, बारीक सारीक चुरी करायची... जगायसाठी आणि तारखा खेळायसाठी..! चरण्याच्या अंगावर आजपर्यंत 200 पेक्षा जास्त गुन्हं हायती. त्यात हरभऱ्याचा ढाळा उपासला, द्राक्षं चोरली इथंपासून ते सोन्याचं दुकान फोडलं इथपर्यंत. केल्यालं तर हुतंच; पण केलं नसल्यालंबी अनेक गुन्हं त्याच्या माथी मारलं हुतं.
चरण्या सांगत हुता, "पोलीसांना कुठं चोरी झाल्याव कोण घावना; की त्यांनी सरळ रात्री- बेरात्री आमची वस्ती धरायची. झोपेतून उठवून घावंल ती पोरगं धरायचं. गाडीत घालून पोलीस स्टेशनला न्ह्यायचं आणि न केलेलं गुन्हं त्याच्यावर घालून मोकळं व्हायचं. कोण विचारायचं त्यासनी? किती विरोध करायचा? अडाणी माणसं आमी. ज्याला जेवढा करता यील तेवढा अत्याचार त्यानं आमच्याव करायचा. वकील, पोलीसाला मागील तेवडा पैसा द्यावा लागतोय. त्यो न्हाय दिला; तर पोलीस आमच्या बायका वापराय मागत्यात. तुरुंगातली पोरं सोडवाय; मग ईच्छा नसली तरी बाइनं झोपायचं..! "काही महिन्यांपूर्वी बदली झालेल्या तासगांवच्या एका पोलीस उपनिरीक्षकाचं नाव घिऊन, तोंडाला यील तशा शिव्या त्यो द्याय लागला... "लय अन्याय केला भाड्यानं आमच्याव. कारवाया दाखवायला खोटं गुन्हं आमच्या पोरांच्या माथ्याव मारून, सायबापुढं आपली गांड लाल करून घ्यायचा." याच्यापेक्षाही वाईट भाषेत त्यानं आपला राग व्यक्त केला. "आमी चुरी किली तर बेशक आमच्यावर कारवाया करा. काय वाटणार न्हाय आमाला त्याचं. पण न केल्यालं गुन्हं आमच्या माथी का?" असा त्याचा सवाल.! 13 ऑगस्ट 2017 ला उदगांव ता.शिरोळ येथील निकम मळ्यात धाडसी दरोडा पडला. 'अरुणा बाबुराव निकम' या महिलेचा खून झाला. सात लाखांची लूट झाली. या गुन्ह्यातील टोळीत असल्याचं सांगत, जाबाज उपकाऱ्या पवार (वय 22) याला कोल्हापूर पोलीसांनी उचललं. तवापासून त्याला ना जामीन, ना काय..! आसला ह्यो कारभार... आसं सांगत, 'लोकमत' पेपरला पहिल्या पानावर आलेली त्यावेळची बातमी त्यानं दाखवली.
सगळेच पोलीस आणि अधिकारी वाईट नसतात; हे सांगायलाही चरण्या विसरला न्हाय. 'दिगंबर प्रधान' नावाचा डीवायएसपी तासगांवला असताना त्यो आमाला समजावायचा. चोऱ्या करू नका, चांगलं राहा, पोरांना शाळा शिकवा म्हणायचा. चांगली- चांगली माणसं आमच्या पालावर आणून चांगल्या शानपणाच्या गोष्टी सांगायचा. तेचा आमच्याव विश्वास हुता आणि आमचाबी त्याच्याव..! कधी पोटासाठी केलेल्या चोऱ्या, सायेब न विचारता आमी त्यासनी सांगायचं. येगदा कुठल्यातरी चोरीच्या तपासाला सायेब धा- बारा पोलीस व कुत्री घिऊन आमच्या पालाव आलं. कुत्रं हुंगत घरात शिरलं. काय घावंना, कुत्रं परत भायर आलं.चरण्या प्रधान सायबाला म्हणला, "सायब... कुत्रं चोराच्याच हातात असल्यावर चोर धरणार कसं?" सायबानं हात जोडलं,"हित भेटलास, वर भेटू नको.!" आसं सांगत निघून गेलं. तत्कालीन एक नामांकित एसपी म्हणला हुता, "चरण्या तुमी कसल्या चोऱ्या करताय लगा. खरी चोर तर आमच्या खाकी वर्दीत हायती."
चरण्याला कायद्याची माहिती तोंडपाठ..! सगळं कायदं, त्यातली कलमं त्यो धडाधड सांगत हुता.2 वर्षापूर्वी कुणीतरी रेशनिंगच्या दुकानात चोरी किली आणि त्याचं खापर फुटलं याच्याव.! तवापासनं त्याचं रेशन बंद हाय. "तासगांवात आमी एवढ्या दिवस हाय; पण राहती जागा आमच्या नावावर न्हाय. लाईट, पाणी, घर यासारख्या सुविधा न्हाईत. घरकुलाच्या यादीत फक्त माजं नाव, बाकीच्यांनी कुठं ऱ्हायाचं? आमी मेल्याव आमाला डोंगरात कुठंतरी न्हेऊन पुरावं लागतंय. कोण जागा देत न्हाय. आमाला आय कुठाय? सांगा तुम्ही..!" त्याच्या या शब्दाच्या माऱ्यानं गलबलून आलं. "आमी चोऱ्या केल्या मान्य; पण त्या का केल्या, याचा कधी तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी विचार केला का? पोटाची आग भागवायलाच चोऱ्या न्हवं; चोऱ्या करून माडी बांधली न्हाय..! या पत्र्याच्या खोपटात ऱ्हायाला आमाला काय हौस हाय का? कुणी कुत्र्याला दगुड मारला; तर परत ते तिथं जात न्हाय. आमी तर माणूस हाय.! कुणाला अपमानित जिणं जगायला आवडंल सांगा..! वन विभागाच्या अधिकाऱ्याला विचारा... त्याच्या शेजारीच हाय आमी, आमचा ताप कधी त्याला हाय का?" चरण्या पोटतिडकीनं सांगत हुता.
"सगळीकडं पारध्यांना जागा, घर, कसायला जमिनी मिळाल्यात. त्यांनी चोऱ्यामाऱ्या सोडल्यात. पोरं शाळा शिकत्यात. आमालाबी नकोय आसलं फाटकं जगणं. सरळमार्गी जिणं जगाय आवडंल आमाला; पण आमची तासगांवची नगर- पालिका आमाला या सुविधा कधी देणार?" असा त्याचा आर्त सवाल..! चरण्याची 'मुंब्रादेवी' ही कुलस्वामिनी. जानेवारी महिन्यात तिची जत्रा असते. तिला 'हाल्याची जत्रा' म्हणतात. "आमची देवी लय कडक हाय. छातीवरच बसत्या.", म्हणला. देवीला रेड्याचा बळी दिला जातो. उंच कुठंतरी टेकडावर ही जत्रा असत्या. सारी पै-पावणं येत्यात. मांस संपेपर्यंत तीन तीन दिवस जत्रा चालती. ही जत्रा मजी एखादया मोठ्या गुन्ह्याची योजना किंवा केलेल्या गुन्ह्याचं सेलिब्रेशन असा ब्रिटिशांचा भ्रम..! आजही पोलीसांबरोबरच सगळ्यांना तसंच वाटतंय.
जगण्याची फेसाटी झालेल्या या लोकांना शिक्षणाचं महत्व आता पटू लागलंय. बारकी बारकी पोरं आता शाळंला जात्यात. 'हृतिक संजय पवार' ह्यो पोरगा आता 10 वी ला हाय आणि शिकून त्याला पोलीस बनायचं हाय. चरण्याच्या पालात शिरलू. एका बारक्या पोरीला शाळंला जायची घाय झालती. फुटक्या आरशात बघून ती केस इचरत हुती. 4 भांडी, दगडाची चूल, चूलीत ढीगभर राख, धुरानं काळं झाल्यालं पत्रं, झोपाय फाटकी तुटकी कोपऱ्यात पडलेली बोतकार... आसली दयनीय परिस्थिती नजरेस पडली. आड्याला आडकवलेल्या बुट्टीत चपातीचा एक तुकडा व 4 मिरच्या हुत्या. पालाच्या बाहेर आलो. साडीची दुरी करून त्यावर फाटकी तुटकी कापडं वाळत घातली हुती. पाणी घालून चांगलं वाढवल्यालं झाड दारात दिसलं. देशी गाईची वर्षाची छानशी पाडी दारात हुती. बारकी पोरं त्याला उसाचं वाडं खाऊ घालत हुती. संविधान, स्वतंत्र भारत, इज्जतीनं जगणं या सगळ्याचा काडीचाही संबंध त्यांच्या जगण्यात न्हवता. निसर्ग हीच त्यांची संस्कृती..! साहित्यिक, सांस्कृतिक आसलं काय आसण्याचा विषयच न्हाय. ''हे विश्वची माझे घर " आसं म्हणत त्यांच्या नशिबी कायमची भटकंती ठरल्याली. निसर्गाचाच कायदा त्यांना लागू. माणसांवरही ते एका मर्यादेच्या पलीकडे प्रेम करत नाहीत. एखाद्यानं खून केला; तर त्याचा बदला खूनानंच घेतला जातो. परत सगळं विसरून ते पुन्हा नव्याने जगायला सुरवात करतात.
अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतला 'फकिरा' दरोडा घालायला सावकाराच्या घरात जातो. सावकार घाबरतो. घरातलं सगळं घिऊन जावा; पण अब्रू घिऊ नका म्हणतो. यावर फकिरा म्हणतो, "आब्रू लुटून पोट भरता येत नाही. हे पोटासाठी हाय, तुमची आब्रू ठेवा तुमच्याजवळच.!" चरण्याचंही याच्यापेक्षा वेगळं काय हाय? माणूस म्हणून कधी आम्ही तेच्याकडं बघितलच न्हाय. त्याला आपल्यात कधी मिसळूनच घेतलं न्हाय. पारध्यास्नी चोर समजून; त्याच नजरेतून आपण त्यांच्याकडे बघतोय. त्याला काही काम नाय दिलं; तर त्यानं जगायचं तरी कसं? तो तर पोटासाठी गुन्हेगार झालाय. आमी मात्र सातव्या वेतनात 60 -70 हजार पगार असून शे-पाचशे रुपयांसाठी भ्रष्ट कामे करतोय. दिवसाढवळ्या दरोडे घालतोय..! राहिला विषय चरण्याचा; तर "माझ्या अंगावर गुन्हेगारीची झूल घालून किती जण जगली?" या त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? इथल्या व्यवस्थेकडे असेल का याचे उत्तर ? कदाचित नसेलच....!