छावी
छावी
छावी
''आज मी तुमच्या घरी जाणार आहे, मिस्टर काशिनाथ जाधव .'
'का ? कशासाठी?'
'असेच. माझ्या मनात कधीपासून आहे कि तुमच्या घरी जावे.'
पण माझ्या घरी जाऊन काय करणार आहेस?"
'काही नाही. सहजच .'
'पण काहीतरी असेल ना ?'
'काहीच नाही . '
'तरी पण ?'
'तुमच्या बायकोला ,म्हणजे माझ्या बहिणीला भेटणार आहे.'
'हो का. आणि काय करणार? तिचा मार खाणार आहे का?'
'का? मी कशाला तिचा मार खाऊ? आणि ती का मला मारेल?'
'तू काय म्हणून घरी जाशील?"
'जाईल काहीही कारण घेऊन .'
'आणि तिने तुला विचारले तू कोण आहेस? तर काय उत्तर देशील?'
'सांगेन,मी तुमच्या नवऱ्याची छावी आहे.'
खरे म्हणजे ती गमतीने म्हणत होती. ती काही घरी जाणार नव्हती आणि असे काही बोलणारही नव्हती. पण मस्करीत ती वास्तव बोलून गेली होती. मी विचारात पडलों .खरोखर हिचे आणि माझे नाते काय?
आम्ही एकमेकांवर जवळजवळ सहा वर्षांपासून प्रेम करत आहोत. दोघेही एकमेकांसाठी जीव द्यायला तयार आहोत. पण दोघेही एकमेकांच्या घरी जायला तयार नाही आहोत. चोरून लपून आमचे जीवापाड प्रेम सुरु आहे. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. लैला-मजनू, शिरी-फरियाद , हिर-रांजा,
शहजादा-अनारकली. आणखी कोणी असतील. तर त्यांच्याही पेक्षा आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. इतके कि आम्ही एकमेकांशिवाय राहूही शकत नाही. पण आमचे घर सांभाळून. ती तिचे घर सांभाळून, मी माझे घर सांभाळून. ती घरी गेली कि तिच्या मुलांवर खूप प्रेम करते. जितके माझ्यावर प्रेम करते, तितकेच तिच्या नवऱ्यावर देखील करते. नवऱ्याला हवे नको ते बघते. त्याची रात्र रंगवते. मी माझ्या घरी सुखात असतो. माझी बायको माझ्या बाहूत असते तेव्हा मी तिला विसरलेला असतो. कधी कधी तुलना करतो. पण काही क्षणातच विसरून जातो. जेव्हा मी घरात असतो तेव्हा मी बायको मुलांचा असतो. जेव्हा घराच्या बाहेर पाय ठेवतो. तेव्हा पहिला फोन तिला करतो. दिवसभर आमचे फोन सुरु असतात. मेसेजेस सुरु असतात. तसे फोन मी घरी सुद्धा करतो. काय हवे नको ते आणू का, विचारतो .
ती सुद्धा दिवसभर कामावरून थकून घरी जाताना काहीतरी भाजीला घेऊन जाते. तिचा नवराही माझ्यासारखा घरी भाजीला घेऊन जातो मुलांना खाऊ घेऊन जातो.
जेव्हा आम्ही सोबत असतो. तेव्हा फक्त एकमेकांचा विचार करत असतो. कधी कधी घरचा विषय निघतो. मी तिला विचारतो , ' त्यादिवशी तुला घरी जायला उशीर झाला तेव्हा तुझा नवरा तुला रागावला तर नाही ना ? '
ती म्हणते , नाही मी त्याला गंडवले. सांगितले गाडी लेट होती.'
कधी बाहेर जायचे असले आणि मी विचारले ,' येणार आहेस का?
तर ती सांगते,' ते घरी आहेत . नाही जमणार , किंवा बघते प्रयत्न करून .'
कधी ती माझ्या मुलांबद्दल चौकशी करते. कधी मी तिच्या मुलांबद्दल चौकशी करतो. इतकेच.
तिची मुले मला ओळखत नाहीत; पण मी त्यांना ओळखतो. माझी मुले तिला ओळखत नाहीत; पण ती त्यांना ओळखते. आम्ही कधी एकमेकांच्या घरची ओळखच करून दिली नाही. आणि देणार तरी कशी ? ती राहते ठाण्याला आणि मी राहतो माटुंग्याला. मग आमचे संबंध कसे जुळले ? आम्ही कसे एकमेकाला ओळखतो ? नेहमी भेटता का? कुठपर्यंत मैत्री आहे ? वगैरे प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
कुणी सांगितली ही पंचाईत ? एकमेकांच्या घरातील लोकांना नाही भेटलो तर आमच्या प्रेमात काही खंड पडणार आहे का?
ना तिला फरक पडत, ना मला फरक पडत. मग एकमेकांच्या घरची ओळख करून कशाला ब्याद ओढाऊन घ्यायची ? भेटतो ना आम्ही एकमेकांना ? आणि आम्हाला घेणे देणे आहे ते एकमेकांशी , बाकी कोणाशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही.
जेव्हा ती काही वस्तू नवऱ्यासाठी घेते तेव्हा तशीच वस्तू माझ्यासाठीही घेतेच घेते. मी जेव्हा माझ्या पत्नीसाठी काही घेतो. तेव्हा तिचाच विचार माझ्या मनात असतो. म्हणजे जर मी माझ्या पत्नीसाठी साडी घेतली तर तिलाही घेतोच घेतो. आणि तिला जर कळले माझ्या पत्नीला मी साडी घेतली आहे. आणि तिला घेतली नाही किंवा दाखवली नाही की बाई फुगलीच म्हणून समजा. मग मी असे करतो तिलाच घेऊन जातो दुकानात आणि तिच्याच पसंतीने माझ्या बायकोसाठी साडी घेतो. आणि तिच्यासाठी पण घेतो. म्हणजे ती पण खुश आणि ही पण खुश.
कधी मी पिकनिकला बाहेर गेलो. तर तिचा खूप जळफळा
ट होतो. मग मला म्हणते, ' फिरा , फिरा हवे तेवढे. आमचा कोणाला कशाला विचार येईल? आम्ही कोण लागतो तुमचे ?'
मग मी पिकनिक स्पॉटवरून काही खरेदी करताना बायको आणि मुलांची नजर चुकवून काहीतरी तिच्यासाठी घेऊन सर्वांपासून लपवून घेऊन येतो. ती काय भेट आणली यापेक्षा मी ती तिच्यासाठी इतक्या दुरून घेऊन आलो ह्याचे तिला खूप कौतुक वाटते. मग त्यादिवशी दोन पप्प्या जास्त देते.
ती कधी बाहेर गेली. तर ती सुद्धा माझ्यासाठी काहीतरी आणते. मला खूप आनंद होतो. इतक्या दिवसाच्या विरहाची कसर काढत असताना मी तिला दोन पप्प्या जास्त देतो.
आम्हाला कुठे भेटायचे असले की , माझ्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनवून आणतेच आणते. नाही सांगितले तरी ऐकत नाही.
ती दिसायला माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहे की माझी बायको तिच्या पेक्षा सुंदर आहे, याचे कोडे मला अजूनही सुटले नाही. पण मी दोघींवरही तितकेच प्रेम करतो. ती सुद्धा तिच्या नवऱ्यावर माझ्या इतकेच प्रेम करते. तो आजारी पडला की कासावीस होते. काय करू आणि काय नको , असे तिला होते. त्याची खूप सेवा करते. त्याला आजारातून बरे करते. त्यावेळेस तिला मीही काही मदत लागली तर ती करतो. ती फार स्वाभिमानी आहे, पैसे कधी घेत नाही. 'फक्त शुभेच्छा दे' म्हणते. म्हणून तर मला ती खूप आवडते.
पण मी जेव्हा आजारी पडतो. चार आठ दिवस घराच्या बाहेर पडता येत नाही. तेव्हा तर तिची अवस्था खूप कठीण होते. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाची जशी अवस्था होते. तशीच तिची अवस्था होते. दवाखान्यात दाखल असलो तरी घरातील कोणी असतील या भीतीने ती दवाखान्यात येऊ शकत नाही. तिला माझी सेवा करायची असते. पण तिच्या नशिबात नसते. मग ती देवाला माझ्यासाठी नवस करते. लवकर बरे वाटू दे , असे म्हणते. ती माझ्या मुलांवरही तितकेच प्रेम करते जितके तिच्या मुलांवर करते. माझ्या बायकोचा कधी दुस्वास करत नाही. उलट सांगते ,'ती खूप नशीबवान आहे , तिला तुमच्या सारखा नवरा मिळाला. अगोदर का नाही भेटलात? '
मी सुद्धा तिच्या नवऱ्याचा हेवा करतो, 'तो नशीबवान असल्याचे तिला सांगतो. 'त्याला इतकी सुंदर आणि समजदार बायको मिळाली .'
आमची अशी एकमेकांवर प्रेम करण्याची पद्धत जगावेगळी आहे. तिच्या नवऱ्याला तिने दुखाऊ नये, माझ्या बायकोला मी दुखावणार नाही. असा आमच्यात करार झाला आहे.
कारण आमचे दोघांचे असे म्हणणे आहे की, त्या बिच्याऱ्यांचा काय दोष? आम्हीच एकमेकाला उशिरा भेटलो. जर लवकर भेटलो असतो तर कशाला असे लपत छपत भेटावे लागले असते?
ती माझ्यावर तिचा अख्खा पगार उधळायला तयार असते. आणि मी सुद्धा काही कमी करायला तयार नसतो. मला तर सगळ्या हिरोईन मध्ये तिचीच छबी दिसते. आणि ती म्हणते ,'माझ्या हिरोसारखा कुठलाच हिरो नाही.'
रविवारी आम्हाला सगळ्यांना सुट्टी असते ,म्हणजे माझ्या मुलांना, तिच्या मुलांना, तिच्या नवऱ्याला माझ्या बायकोला, आणि आम्हा दोघांना. त्यामुळे रविवार म्हणजे आम्हाला बंदिवार वाटतो. खूप मिस करतो आम्ही दोघेही एकमेकाला.
गुपचूप आम्ही एकमेकाला एखादा फोन किंवा मेसेज करतोच करतो. तेव्हाच आम्हाला चैन पडते. तिने तिच्या मोबाईल मध्ये माझे नाव सुरेखा ठेवले आहे तर मी तिचे नाव माझ्या मोबाईलमध्ये आमच्या साहेबांच्या नावाने सेव्ह केला आहे. कधी कधी तिचा फोन आला की माझी बायको म्हणते,' तुमच्या साहेबांचा फोन आला आहे. करमत नाही का त्यांना सुट्टीसुद्धा सरळ उपभोगू देत नाहीत.'आणि तिच्या नवऱ्याला माझा फोन मिळाला तर तो तिला देत म्हणतो, 'अग, तुझी मैत्रीण सुरेखाचा फोन आहे ,घे. 'मग ती फोन घेऊन किचनमध्ये जाते आणि माझ्याशी सुरेखा म्हणून बोलते. असे आमचे बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे वर्षांपासून आणि आणखी मरेपर्यंत चालू ठेवण्याचे आम्ही एकमेकाला वचन दिले आहे .
इतके आमचे घट्ट प्रेम आहे. ती तिच्या नवऱ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते आणि मी माझ्या बायकोपेक्षा तिळभर जास्तच प्रेम तिच्यावर करतो. आम्ही दोघे नवराबायको सारखेच एकमेकांवर प्रेम करतो. एकमेकांचे सुखदुख जपतो. तिला ठेस लागली की, मी कळवळतो. मला काही झाले तर तिच्या डोळ्यात अश्रू येतात .
पण तिची ओळख मी जगाला काय करून देऊ? किंवा ती माझी काय ओळख करून देणार?
आम्ही एकमेकांवर कितीही प्रेम करत असलो. तरी माझे मित्र तिला माझी छावीच म्हणत असणार ना?