आठवणीतील क्षण
आठवणीतील क्षण
स्वघरापासून दूर असलेले घर किंवा विद्यार्थ्यावर सुसंस्कार घडवणारे केंद्र म्हणजे वसतिगृह होय. मी सामान्य बुद्धिमत्तेचा मुलगा. लहानपणापासून मला झोपेचे फार वेड होते. शाळेत जायच्या दिवशी मी कधीच लवकर उठत नसे मात्र रविवारी सकाळी ६ वाजता उठून ७ वाजता गावाच्या क्रिकेटच्या मैदानात हजार असायचो.आई बोलायची "तू रोज लवकर उठत नाहीस, स्वतःची काम स्वतः करत नाहीस थांब तुला आता वसतिगृहात पाठवते शिकायला." हे ऐकू येताच मनात धडकी भरायची.आईला थोडा मस्का मारत उद्यापासून असे होणार नाही याची खात्री द्यायचो.१० वी मध्ये उत्कृष्ट श्रेणीमध्ये पास होऊन मी स्वतः वसतिगृहात राहून शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला.
लहानपणापासून मी वसतिगृहाबद्दल काही गोष्टी अनेक लोकांकडून ऐकले होते की,तिथे लवकर उठावे लागते,सगळी स्वतः ची काम स्वतः करावी लागतात, कडक नियम असतात, तिथले अधिक्षक विद्यार्थ्याना सारखे सारखे घरी सोडत नाहीत इत्यादी. वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर आपली काळजी कोण घेईल..? आपल्यासोबत असणारी मुलं कशी असतील? अधिक्षक कसे असतील? खूप शिस्तीत रा लागेल का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेऊन मी सन २०१२ मध्ये वसतिगृहात प्रवेश घेतला. .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जेलरोड,रत्नागिरी या वसतिगृहात प्रवेश घेत असताना माझ्याकडे काही कागदपत्रे अपुरी पडत होती तरीही माझे गुणपत्रक पाहून वसतिगृहाच्या अधिक्षिका कांबळे मॅडम यांनी मला प्रवेश दिला. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.काहीच दिवसात मी माझ्या अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्याकडे सुपूर्द केले त्यामुळे माझ्यावरील त्यांचा विश्वास अधिक घट्ट झाला.
वसतिगृहात प्रवेश झाल्यानंतर मला वसतिगृहा कडून एक बेड, ताट , बेडशीट, वह्या, पुस्तके मिळाली. मी नवीन असल्यामुळे फारसा कोणाजवळ बोलायचो नाही. काही दिवसातच ओळखी वाढल्या आणि वसतिगृहाच्या जीवनाशी मी मिसळून गेलो. रोज सकाळी ५ वाजता प्राथर्ना व्हायची त्यानंतर सर्वांना एक पेला दूध आणि २ अंडी मिळायची.सकाळी नाश्ता मध्ये कांदेपोहे, उपमा,शिरा हे पदार्थ मिळायचे.सकाळी कोणी नाश्ता साठी वेळेत गेले नाही तर रिकामी पातेली पाहायला मिळायची. सुरुवातीला एक वाटी भात,३ चपाती, आमटी,भाजी, असा आहार असायचा. जेवणाचा दर्जा चांगला नसायचा.
पोटभर अन्न आणि त्याचा दर्जा चांगला असावा यासाठी आम्ही मुलांनी आंदोलन केले. त्यामध्ये मी आणि वसतिगृहाची काही जुनी मुले होती. काही दिवसातच शासनाने आमच्या मागणीकडे त्वरित लक्ष दिले आणि आम्हाला मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारला. यामुळे वसतिगृहातील मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. १५ ऑगस्ट,२६ जानेवारी तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांन मधील सुप्त गुणांचा अविष्कार व्हावा यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन केले जायचे. सायंकाळी होणाऱ्या प्रार्थनेच्या वेळी अधिक्षिका ढवणे मॅडम आम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये पुढे जाण्यासाठी,टिकून राहण्यासाठी आम्ही काय करायला हवे याबद्दल मार्गदर्शन करायच्या. सर्व मुलं एकजुटीने राहायचे. शनिवारी रात्री आम्ही सर्व एकत्र येत असू त्यामुळे गप्पागोष्टीना फारच रंगत यायची.
आम्ही वसतिगृहातील मुल नसून आम्ही एक कुटुंब तयार केले होते. वसतिगृहाने मला स्पर्धेच्या युगात कसे जगावे शिकवले.आपले प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी तल्लख बुद्धी वसतिगृहात विकसित झाली. चांगल्या मुलांचा चांगला सहवास लाभला त्यामुळे माझे व्यक्तिमत्व सुधारले. माझी सहकार्याची भावना वृध्दींगत झाली. वसतिगृहात वेळोवेळी होणाऱ्या स्पर्धा यांच्यामुळे नेतृत्व गुण माझ्यातील विकसित झाले. माझ्या जीवनात वसतिगृह हे एक अविस्मरणीय आठवण आहे.