आपुलकी
आपुलकी
गावकऱ्यांच्या आपुलकीला शतशः नमन!
'घरच्या मंडळींना लग्नाला जायचंय..'
'शेतात ऑटो थांबलाय, त्याला हळद मोजून द्यायची...'
'बैल जुंपून नेमकेचं औत चालू केलंय..'
आणि तितक्यात माझा call जातो..
मी : "निर्गुणराव, कुठे आहात? एक काम आहे."
कुठलाही आढावेढा न घेता,
निर्गुणराव : बोला की सर, शेतात होतो हो. सांगा काय काम आहे?
मी : बैलगाडी पाहिजे अर्धा तास. मुलांची फेरी काढायची.
निर्गुणराव : 10 मिनिटात घेऊन येतो सर..
तेवढ्यात शाळेतील दुसरीत शिकणारा
देवानंद : सर, आमच्या घरी झुली आहेत, आणू का?
मी : अरे जा पळ, घेऊन ये..
तितक्यात बैलगाडी शाळेसमोर. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष इतर गावकरी मंडळी एकत्र येऊन गाडी सजवणे सुरू. तितक्यात शिक्षण विस्तार अधिकारी मॅडमचे आगमन.
विद्यार्थ्याने आणलेल्या झुली बैलाच्या अंगावर चढवून गाडीला फुगे लावून गाडी सजली. वाहनचालक म्हणून उपाध्यक्ष शिवराज पोटले यांनी जबाबदारी उचलली. मोठ्या विद्यार्थ्यांनी बँड, डफली वाजवत मिरवणूक काढली. सर्व उपस्थित मंडळी, विद्यार्थी व शिक्षण विस्तार अधिकारी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी व त्यांच्या आई वडिलांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेच्या दारी घेऊन आलोत. शिक्षण विस्तार अधिकारी मॅडमनी सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. नियोजनानुसार दिलेल्या कृती करून सर्वांना फराळ दिला व मेळाव्याची सांगता झाली.
कार्यक्रम तर अगदी छान पार पडला परंतु किती अडचणीतून गावकरी मंडळींनी वेळ काढला व व्यवस्था केली हे नंतर कळाले. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी कु. मोहिनी देबगुंडे म्हणाली, "सर मला आई-काकूसोबत लग्नाला जायचे नव्हते पण मला जबरदस्तीने कार मध्ये घेऊन गेले."
शाळेजवळून कार जाताना तिने मला आवाज दिला होता पण मला वाटले ते गावाला जात आहेत, जाऊ द्या. पण ती म्हणाली सर तुम्ही मला "मोहिनी, गावाला जाऊ नकोस, कार्यक्रम आहे खाली उतर असे म्हणाल वाटले. मी गाडीतून उतरणार होते, लग्नाला जातच नव्हते."
आज शाळेत नाईलाजाने अनुपस्थित राहिलेल्या शिवम व मोहिनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे हे वाक्य ऐकून स्वतःला थोडे गहिवरून आले.
आता सांगा, प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्याला आणखी काय हवं..!