आदर्श विद्यार्थी...
आदर्श विद्यार्थी...
इयत्ता पहिलीपासून एक एक वर्ग पुढे पुढे जात आता सहावीत पोहचलेल्या यशला अजूनही शाळेचा 'आदर्श विद्यार्थी' म्हणून गौरविण्यात आले नव्हते. तो मनातून खूप नाराज होता. पण त्याला खात्री होती, की एक ना एक दिवस त्याला 'आदर्श विद्यार्थी' पुरस्कार नक्कीच मिळणार. आपण नक्की कुठं चुकत आहोत हे त्याच्या लक्षात येत नव्हते. एकदा त्याने आपले वर्गशिक्षक श्री. सकपाळ गुरुजींना विचारूनच टाकले. "गुरुजी! मी नेहमी पहिला नंबर काढतो, नेहमी शाळेत येतो, कधीच सुट्टी नाही करत मग मला का नाही शाळेचा 'आदर्श विद्यार्थी' ठरवत? " यशचे बोलणे ऐकून गुरुजी थोडावेळ त्याच्याकडे बघताच राहिले. मग काही वेळाने हसून म्हणाले. "अरे यश, बाळा नुसते हुशार विद्यार्थ्याला आदर्श ठरवता नाही येत रे, तर त्याच्या अंगी आदर्शपणाचे सारे गुण असावे लागतात." "म्हणजे?" यशने परत प्रश्न विचारला. यावर गुरुजींनी त्याला वर्गात आपल्या जागेवर बसायला सांगितले. शाळेची मधील सुट्टी झाली असल्याने त्यावेळी सारी मुले वर्गाबाहेर होती.
सकपाळ गुरुजी सांगत होते आणि यश शांतपणे ऐकत होता. "बाळा! आदर्श विद्यार्थ्याकडे नुसते पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर, त्याच्याकडे प्रामाणिकपणा असावा. जिद्द चिकाटी मेहनती सह त्याला परोपकार करता आले पाहिजेत. त्याला मोठ्यांचा आदर करता आला पाहिजे. रागावर नियंत्रण ठेऊन मित्रांमधील वाद त्याला मिटवता आले पाहिजेत. देवाप्रमाणेच त्याला आई वडील आणि गुरुजनांना वंदनीय मानता आले पाहिजे. अभ्यासातील सर्व विषयात हुशारी दाखवताना त्याने विविध खेळांत पटाईत असले पाहिजे. सर्वधर्म समभाव, निटनिटकेपणा, कर्तव्यदक्षता, सार्वजनिक एकात्मता अशा विविध मूल्यांची त्याला जाणीव असली पाहिजे. स्वावलंबनासह इतरांच्या प्रति आदर व्यक्त करत असताना स्वतः सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार कुठल्याही पदार्थावर नावडती मोहोर न लावता केला पाहिजे." तर यश! बाळा तू हे सारं जेव्हा करशील त्या वेळी आपल्या शाळेसह जीवनाच्या ही शाळेत तुला आपोआप आदर्श विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र दिले जाईल."
आपल्या सकपाळ गुरुजींनी जे जे काही सांगितले ते यशला पटले होते. आज सहावीत शिकत असलेला यश, नेहमी सकाळी लवकर उठून आंघोळ करून प्रथम कर वंदन, मग भू-वंदन नंतर आई बाबांना वंदन करून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दिनक्रम चालू करतो. नेहमी खरे बोलतो, कधी कुणाशी भांडत नाही व कुणी भांडत असेल तर त्यांची भांडणे हसतमुखाने सोडवतो, गावातील वृद्धांना मदत करतो, मोठ्या माणसांचा आदर करतो, शाळेतील तर सर्व कामांमध्ये पुढाकार घेतो, गुरुजनांनी सांगिलेली सर्व कामे अगदी आनंदाने करतो आणि दिलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पाळतो, शाळेतील विविध कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होतो, कारण त्याला सातवीत "आदर्श विद्यार्थी" बनूनच पदार्पण करायचं आहे. मित्रांनो! “तुम्हीही बघा एकदा आदर्श विद्यार्थी बनून.” एक सांगू का? "जेव्हा आपण शाळेत सर्व मुलांमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून निवडले जातो ना, तेव्हा जाम म्हणजे जाम भारी वाटते." हा! "पण आदर्श विद्यार्थी बनल्यावर आपली आदर्शवादी तत्वे मात्र विसरून जायचं नाही बरं का!"