Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Inspirational

2.5  

Suresh Kulkarni

Inspirational

दत्ता काका

दत्ता काका

7 mins
16.5K


दुटांगी पांढरधोतर , वर पांढरा सदरा , डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी , अन बगलेत धरलेली आडवी छत्री या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही .दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ . वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान . त्याचे आई वडील प्लेगात गेले . जाताना ' रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ' असे वचन घेतले होते म्हणे . ते आमच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी मरे पर्यंत पाळले . अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा ! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला !

दत्ताकाकांचे आणि आमचे शेत लागूनच होते . तो ते दोन्ही बघायचा . वर्षाचा काय माल असेल तो गाडीत घालून आणून द्यायचा . नौकरी मुळे अण्णांना शेती कडे लक्ष देता येत नसे . सारी मदार दात्ताकाका वरच होती . शेती साठी तो आमच्याच वाड्यात गावी रहात असे . 

सणावाराला विशेषतः दिवाळीच्या पाडव्याला , शेतीतली काही 'नव्हाळी 'घेऊन यायचा , सोबत पेरू ,आंबे- बोर असलं काहीतरी आणत असे . दिवाळीत सक्काळी उठलंकी 'तुझा दत्ताकाका आलाय बरका !' आई सांगायची . कोण आनंद व्हायचा . येताना तो माझ्यासाठी कधी गावच्या सुताराकडून विटी -दांडू , कधी भवरा आणायचा . एकदा तर दगडी गोट्या घडवून आणल्या होत्या . दिवाळीत तर चार फुलबाज्या माझ्या साठी आणायचा . म्हणून तो मला खूप आवडायचा . माझ्यावर त्याचा थोडा ज्यास्त जीव होता . त्याला दोन मुलीच होत्या मुलगा नव्हता म्हणून असेल . 

पण मला जसे जसे कळू लागले तसे तसे त्याचे प्रताप पण ध्यानात येऊ लागले . तो प्रचंड आळशी होता . दोन वेळेला जेवून ढाळंजत, कोणालातरी पकडून गप्पा छाटत बसायचा . नसता गावभर उचापती करत फिरायचा . त्याच्या उचापतींना कंटाळून अण्णांनी त्याचे लग्न करून दिले . तर 'रंगोबानी माझ्या गळ्यात काळी बायको बांधली !. माझा गळा कापला ! 'म्हणून सांगू लागला . लग्नां नन्तर संसारात रमेल हि अण्णांची अशा दत्ताकाकांनी फोल ठरवली . 

"अरे दत्ता, तू किसना कडून काही पैसे घेतलेस का रे ?" एकदा अण्णांनी त्याला विचारले . 

"किस्न्या काही बोलला का ? फक्त पन्नास रुपये तर घेतलेत ! टाकीन देऊन या खळ्यावर . नाहीतर आत्ता तू दे ,तुला खळ्यावर देतो !, नाहीतर पाच एकरचा तुकडा तुझ्या नावावर करून घे ! हो तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर !" असलं तोडून बोलला . तेव्हा पन्नास रुपये खूप मोठी रक्कम असायची . 

अश्या अनेक उधाऱ्या तो करायचा . त्याची उधाऱ्याची एक अनोखी पद्धत होती . समजा एका कडून दहा रुपये घेतले कि गळ्याशी येजीस्तोवर लक्ष देत नसे . तो बाबा जेव्हा मागायला येई तेव्हा 'चार सहा दिवसात देतो ' म्हणून तो खरंच देत असे ! कसे? तर  दुसऱ्याकडून वीस रुपये उधार घेऊन पाहिल्याचे दहा रुपये परत करत असे आणि दहा रुपये स्वतःह साठी खर्च करीत असे ! अश्या किरकोळ उधाऱ्या वाढल्याकी मग तो 'ठोक ' उधारी ,म्हणजे हजार पाचशेचे कर्ज काढी . आणि सर्व उधाऱ्या देऊन टाकी ! पुन्हा किरकोळ उधारीला गडी मोकळा ! . मग ठोक उधारी साठी एखादा शेतीचा तुकडा विकून टाकायचा ! 

" झालो बाबा एकदाचा या देण्या -घेण्याच्या तुन मोकळा !. रंगोबा , पन्नास रुपय दे बाबा , तुळजापूरला जाऊन येतो " अण्णाला पैसे मागायचा 

" मधी -आधी तुळजापूर कशासाठी ?"

" 'मला ऋण मुक्त कर ' म्हणून आई भवानीला नवस बोललो होतो ! तो फेडायचाय ! "खो --खो -- करून हसत सांगायचा !

"दत्ताकाका ,इतक्या उधाऱ्या करतोसच कशाला ?"मी एकदा त्याला विचारले . 

" अरे ,या बायकांना ,सोन्याच्या बांगड्या , पाटल्या , दागिने ,रेशमी साडया , पैठण्या खूप लागत ! अन त्यासाठी पैसा लागतो . मला कुठं तुझ्या बापा सारखा गब्बर पगार मिळतो ? मग मी उधाऱ्या करतो ! "

" पण काकी तर म्हणते कि तू काहीस देत नाहीस ! 'काकीच्या अंगावर फुटका मणी सुद्धा नाहि ' म्हणून आई पण सांगत होती !"

"काकी ? तिचा काय सम्बन्ध ?"

" मग सोन , साड्या कुणाला ?"

" अरे मी 'बायकांना ' म्हणालो ,' बायकोला ' नाही ! , ते जाऊदे ! सुऱ्या , आरे तू अजून लहान आहेस . मोठं झाल्यावर तुला कळेल !." अन खो -खो करून हसला . 

एकवेळ महादेव तरी बिन नागाचा दिसेल पण दत्ताकाका बिन छत्रीचा दिसायचा नाही . बर ती सुद्धा काठी सारखी नाहीतर बगलेत आडवी धरलेली असे . 

" अरे दत्ताकाका ,छत्रीच ओझं कशाला बाळगतोस उगाचच ?" 

" वाटेत कोल्हे ,कुत्री आली तर हाकलायला लागतात रे . शिवाय ऊन पाऊस आहेच कि . वर चोर -फिर आला तर काठी सारखी छत्री वापरता येते !"

"पण तू तर परवा एस .टी . सुद्धा अशीच बगलेत आडवी छत्री धरून उभा होतास ! "

"बरोबर आहे ! छत्री आडवी धरली म्हणजे खिसा कापला जात नाही ! चोराला जवळच येत येत नाही ना या आडव्या छत्रीने !म्हणून गर्दीच्या ठिकाणी अशीच छत्री धरतो !"असले याचे अजब डोके !

एकदा आमचे अण्णा देव पूजेला बसले . आमच्या कडे चांदीचे देव आहेत . वडिलोपार्जित . ( अजून हि आहेत मी सध्या पूजा करतो ). तर देवातला गोपाळ कृष्ण गायब ! 

'दत्ता, काल तू पूजा करताना देवात रंगनाथ होता का रे ?"

" तर , होता कि !, त्याला गंध -अक्षदा वहायल्याच मला पक्क आठवतंय कि !"

" आज दिसत नाहीरे !"

" रंगोबा ,अरे उंदरांनी नेला असेल ! पंचामृताचा वास असतोना त्याला ! अन तसही घरात एक 'रंगनाथ 'असताना देवात दुसरा काय करायचंय ?" असे म्हणत खो -खो करून हसला .!

त्याच दिवशी संध्याकाळी ढाळंजत घरचे सगळेजण नेहमी प्रमाणे  गप्पा मारीत बसले होते . 

"काय दत्या , अशात उधारी वाले दिसत नाहीत . सुधारलास्की काय ?" कोणी तरी विचारले . 

" अरे बाबा , या वेळेस भारी काम्ब्बक्त्ती आल्ती ! पठाणाचाच तगादा होता ! तंगड तोडतो म्हणाला होता ! "मग ?"

" या वेळेस देवच धावून आला ! देवातला बाळ कृष्ण ! सोनाराने दिले कि गर्जे पुरते ! " खो -खो करून हसत दत्ताकाका म्हाणाला ! मग मात्र अण्णांनी त्याची गय केली नाही . घरातून हाकलून दिले ! 

घरात मोठ्या बहिणीच्या लग्नाचे घाटत होते . पैसा हवा होता . दत्ताकाका शेतीचे काही हाती लागू देत नव्हता . म्हणून अण्णांनी शेती विकून टाकण्याचा निर्णय घेतला . गावाकडे गेल्यावर कळले कि मागेच दत्ताकाकाने सगळी , स्वतःहाची आणि आमची शेती विकून टाकलीय ! तावातावाने अण्णा त्याला जाब विचारायला गेले . 

" रंगोबा काय करू ? माझ्या अन्नपूर्णेच्या लग्नाच्या वेळेस नड होती . तवा तुझी ,माझी सगळीच शेती विकून टाकली ! नाहीतरी मला पोरग नाही , तुला भक्कम पगार आहे ,तुला काय करायचीय शेती ? तसेही त्यात काही पीकतच नव्हतं ! बिन कामाची शेती म्हणून मीच विकून टाकली ! "

" पिकत कस नव्हतं ? आसपासच्या शेतात जोमानं पीक येतात अन आपल्याच शेताला काय झालाय ?"

"तुला खोटं वाटत असेलतर , भागनाला विचार !"

" भागनाला ? म्हणजे तू शेती बटाईने दिलीस कि काय ?"

" हो तर ! मागचं दिली कि ! कोण करणार शेती ? तुम्ही बसा गारे -गार वाळ्याच्या पडद्यात हाफिसात ! आम्हीच का उन्हा -पावसात मरमर करायची ?! मग दिली बटईन ! "

"बर ते बटई च जाऊदे .पण माझ्या नावाची शेती तुला विकताच कशी आली ?"

" त्याला काय ? मीच 'रंगनाथ ' म्हणून सही केली अन टाकली फुकून ! रंगोबा , आता तुला काय करायचंय ते कर ! पोलिसात दे कि जीव घे !"

बसून जरी खाल्लं असत तरी त्याला आयुष्यभर पुरून उरलं असत इतकी शेती होती , पण त्याने विकून खाल्ली ! संख्या भावासारखा त्याने दावा साधला होता .

अण्णा या धक्क्याने खूप खचले . त्यांनी अंथरून धरले . सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले . हे कळल्या बरोबर दत्ताकाका हजर ! अण्णांचं दुखणं विकोपाला गेलं . चार महिने दत्ताकाकानी अण्णाची सेवा केली . अंथरून पांघरून , रात्रीची जागरणे , गुवा मुताची धोतर धुणी , सकाळी कोमट फडक्यांनी अंग पुसून डॉक्टर नि दिलेली पावडर लावणे , थोडा दम लागलाकी धावत डॉक्टरला घेऊन येणे . जेऊ घालणे . सगळं निमूट पणे ,न बोलता केलं . तेव्हा व्हील चेअर ची सोया नव्हती . अंथरुणावर पडून कंटाळा आला कि तो अण्णाला पाठकुळी घेऊन समोर वऱ्हांड्यात चार -दोन फेऱ्या पण मारायचा . अण्णांनी त्याच्याशी बोलणे सोडले होते ते शेवट पर्यंत . अण्णा गेले तेव्हा ' पोरका झालोरे 'म्हणून त्याने हंबरडा फोडला होता . चौदावा करून गेला तो पुन्हा आलाच नाही . बरेच दिवस त्याची काही खबर नव्हती आणि आम्ही पण त्याच्या अश्या वागण्या मुळे आमच्या कडून चौकशी केली नव्हती . 'त्याला घरा पासून दूर ठेवा ' हि अण्णांची इच्छा होती . 

असेच एकदा दत्ताकाका औरंगाबादला घाटीत ऍडमिट असल्याचे कळले . मी त्याच्या भेटीस गेलो . 

" सुऱ्या , बर झालं बाबा तू तरी आलास " बराच खंगलेला दिसत होता . 

" का रे , असे का म्हणतोस ?"

" चारपाच दिवस झालेत , जावई इथं टाकून गेलाय ! "

" काका, अरे काही कामात असेल !. नसेल जमले यायला ! ते जाऊ दे ! मला सांग तू कसा आहेस ?"

" मी न मस्त आहे ! गादी ,पलंग आहे , बोडख्यावर पंखा वारा घालतोय !. अप्सरे सारख्या नरसा अवती भवती फिरतायत !स्वर्गात आहे ! फक्त आपली माणसं नाहीत ! " या चार वाक्यात त्याला दम लागला त्यात हि खो -खो करून हसला . पण हे हसणे भेसूर होते . 

"सुऱ्या , तुला एक मागू कारे? "

" काय ?"

" मला न गरमागरम जिलबी खावीशी वाटतेय रे . देशील का आणून ?!"त्याने निरागस पणे विचारले . दगाबाज दत्ताकाका आणि हा समोरचा दात्ताकाका ,जमीन अस्मानाचा फरक होता !. गरम 'इमरती 'साठी मी ऑटो करून गेला . गरमागरम 'इमारती 'सांभाळत परतलो . पण उशीरच झाला होता ! मी परते पर्यंत त्याने डोळे मिटले होते , कायमचे !

आज या घटनेला चाळीस वर्षाहुन ज्यास्त काळ लोटला आहे . आजही एखाद्या कार्यात जिलेबी दिसली कि ' मला गरमागरम जिलेबी खावीशी वाटतेय रे, देशील ?' म्हणणारा दत्ताकाकाचा आवाज ऐकू येतो , आणि माझा हात जिलेबी पासून आपसूकच दूर होतो ! 

---सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye . 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational