मनातला वळीव
मनातला वळीव
मनात विचारांचं नुसतं दाटलं होतं काहूर,
सतत कसली तरी लागून रहायची अनामिक हुरहूर !
मनावर दडपण खूप ओझं असल्यासारखं,
थोड्याच वेळात वाटायचं थकल्यासारखं !
शरीराच्या गर्मीहून मनाची काहिली भयंकर,
अस्वस्थ मनाला सांभाळायचं तरी कुठवर !
अशातच तो आला, ती त्याची स्निग्ध नजर,
शीतल चंदनाचा शिडकावा करीत होती अंगावर !
तनच नाही तर मनही शांत झाले होते,
काळजीचे सारे मळभ दूर गेले होते !
त्याचे येणे म्हणजे वळीवाचा पहिला पाऊस,
ग्रीष्माची गरमी दूर करणारा हवाहवासा पाऊस !
गरम ढेकळंं मऊ तर रसरशीत धरेला शांत करणारा,
आता फक्त चांगलंच होणार असे आश्वस्त करणारा !
सृजनतेची सुरुवात तर यानंतरच होत असते ना,
मृदगंध सगळ्यांनाच भावत असतो ना !
त्याच्यातील हे सारे गुण गंध माझ्यात लहरू लागले होते,
म्हणूनच माझ्यातील सृजनत्व आता कुठे बहरू लागले होते !
असा वळीवाचा पाऊस भुरळ घालतो वसुंधरेला,
आणि मोहवून टाकतो मग प्रत्येकच जीवाला !
प्रत्येकाच्याच आयुष्यात असा वळीव येतो,
फरक इतकाच की तो आपण किती जाणून घेतो ?