तू कुठे म्हणालास थांब म्हणून .
तू कुठे म्हणालास थांब म्हणून .
त्यादिवशी ती भेटली अचानक
थोडीशी ती बावरली, नंतर पुन्हा सावरली
कसंबसं हसत म्हणाली, तू इकडं कसा ?
खूप दिवसांनी भेटलीस ग मी ही म्हणालो सहजच
थोडंसं लाजत - अडखळत ती बोलून गेली
हो तर नशिबात जे असतं तेच घडत ...
बरं आई - बाबा कसे आहेत सगळे ...मी म्हणालो
बाबा रिटायर झाले , आई बरीय , तुझे सर्व ठीक ना,
बरं येते मी खूप उशीर झाला मुलं वाट पाहत असतील
अन आणखी कोण - कोण वाट पहात तुझी ?
त्यावर ती काहीच बोलली नाही , दूर पाहत राहिली काही वेळ
काय ग , काय झालं ? म्हणताच भानावर आली
तू कुठे म्हणालास थांब म्हणून ...
थांबलेही असते मी त्यावेळी...
तू थट्टेनेच म्हणालीस खरी पण...
जुन्याच स्मृती ताज्या करून गेलीस
प्रेम तर दोघांनीही केलं होतं...
मग जबाबदारी फक्त माझीच होती ?
सांगितलं असतं तू मनातलं सारं काही
तर कुठं बिघडलं असतं
नेहमीच लेडीस फर्स्ट म्हणायचीस
इथेच का तुझा स्वाभिमान आडवा आला ?
केलंही असतं प्रेम समर्पित कदाचित
तू विचारून तर बघायचं असतंस
किती धीरानं म्हणालीस ग तू
तू कुठे म्हणालास थांब म्हणून ...
आज केलेलं धाडस तेव्हा का नाही केलंस ?
जाऊ दे ना , सोड , झालं ते झालं
तू सांग कशी आहेस ..प्रेम तुझं ,पोरं - बाळ
मस्त ... तू कसा आहेस ? मी बरा आहे
बरं येते म्हणत तू नजरेआड झालीस ...
पण तू पूर्वीची चंचल , बोलकी नाही जाणवलीस ....