विहार
विहार
उन्हात शिडी लावली आकाशी
अन् सारे आकाशच रंगवायला घेतले
म्हटले सूर्याला बघ आता क्षणात
तुझा दाहच सारा कमी करून टाकतो
दूरवर मेघराज होता
त्याने ते लक्ष देऊन ऐकले
म्हणाला कलाकार थांब मी पण येतो
तुझ्या मदतीला भरपूर पाणी घेऊन..
आणि रंगकाम निळ्या नभी
मोठया जोमाने सुरु झाले
तसा वाराही धावून आला
म्हणाला तू रंगव मी सुकवतो...
हळूहळू सूर्य नजरेआड झाला
नभांची दाटी झाली तसा
वाराही आनंदात नाचू लागला
सूर्याचा दाहही कमी झाला..
तशी वीज आनंदात कडाडली
म्हणाली चमक भरते मी आवेशात
बरसेल बघ पाऊस निमिशात
तेवढीच नक्षी रेखते मी आकाशात...
जिद्द कलाकाराची पाहून
वरूण राजा प्रसन्न झाला
आणि मनसोक्त मेघगर्जनेसह
चोहोबाजूंनी धुवांधार बरसू लागला...
कलाकार ही तृप्त झाला
म्हणाला धरती मातेला
आई काळजी नको करू
मी रंगवेन आकाश प्रत्येक वेळी तुझ्यासाठी...
तशी धरती ही तृप्त होऊन हसली
आणि म्हणाली
अरे कलाकारा
तुला प्रसन्नतेचे चित्र रेखाटता यावे
म्हणूनच बघ ना तुझ्या कृपेने
मीही हिरवा शालू ल्याले
आणि धन्य धन्य झाले....!