पावसान कुठ कसं पडावं
पावसान कुठ कसं पडावं
आकाशाच्या अंगणात, काळ्या मेघांनी कशाला फिरावं।
अन बरसायचंच नव्हतं एवढं तर, ओरडत कशाला बसावं।।धृ।।
नुसतेच येतात म्हणे मेघ आभाळात, बहुरुप्यासारखे बनून।
अन गोंधळून जातात माणसं पार, त्यांच रोजचचं रुपडं पाहून।।
काळ निळं रोज होत आभाळ, पडेल वाटतं पाऊस।
अन हवामान खात्याला बातमी सांगायची लई मोठी हौस।।
आज मोठा पाऊस येईल, हे आपलं सांगण जरा थांबवावं।
अन अंदाज पावसाचा कळत नाही, तर गप्प तरी बसावं।।१।।
वृक्ष तोड झाली म्हणून म्हणे, पर्यावरणाचा ऱ्हास झाला।
अन आपणच आपल्या जीवनाचा, स्व हितासाठी घात केला।।
धूळ, धूर, कर्ण कर्कश आवाजाने, प्रदूषण फार वाढले आहे।
अन खेडोपाडी, गाव-शहरातून माणूस, आजाराने बेजार आहे।।
दोष काही त्याचाच नाही, सांगा प्रदूषण कसं रोखावं।
अन निसर्गाचा होरा सांगणं, तज्ज्ञानी आता थांबवावं।।२।।
पाऊस कधी असा येतो, घरदारा सकट सारं वाहून नेतो।
अन हाता तोंडाशी आलेलं, पिकलं पिकवलेलं धुवून नेतो।।
निसर्ग वादळवारा पाऊस-पाणी, सर काही त्याचच आहे।
अन माणूस फक्त तुझ्या हातातलं, एक साधं खेळणं आहे।।
झाड झुडपे लावून माणसानं, थोडं भू सख्लन तरी थांबवावं।
अन मग सांगावं कोणी पावसाला, त्यानं कुठं कसं पडावं।।३।।
त्याचच घेऊन सारं काही, माणसं इथं मोठी झाली।
अन वनराई, तोडून, डोगर माळरानं ओसाड केली।।
तलाव, धरण बांधण्या ऐवजी, गटारावर घरं उभी राहिली।
अन वादळ-वारा पाऊस येता, त्यातच सारी बुडून मेली।।
बरसू लागला कधी तरी , म्हणतात एवढं काय पडावं।
अन हे सारं ऐकल्यावर पावसानं, आता कुठं कसं पडावं।।४।।