हे पुरुषा
हे पुरुषा
हे पुरुषा,
काय तुझी पुरुषसत्ताकाची कुटनिती
अन तथाकथित बलिष्ठांची निती ?
आरोप प्रत्यारोप स्त्रीवर लादले.
मानसिक गुलामगिरीत सदैव डांबले,
लांच्छन लावले 'चंचल,अबला'
मूल्य जपता तिचा आक्रोश दबला
नारीनिंदा यथेच्छ चालवलीच आहे
स्वतः ची पातळी घालवलीच आहे
'आपले क्षेत्र, जमीन कोणी कसता
कामा नये' हे तत्व पक्के बाळगतो.
मात्र दुसऱ्याच्या क्षेत्रात उकिरडा करतो ?
गेली कुठे तुझी कर्तव्यकेंद्री निती ?
कसा गेलास तू पशुत्वाच्या पलीकडे?
का करतोहेस स्त्री दास्याचे समर्थन आजही?
माहीत नसता आचार,लादतो तीवर
'स्वैराचार'?
कदाचित.
सोसवत नाही तिचे मानसिक गुलामगिरीतून
बाहेर पडणे, चालीरीतीचे झुगारणे
अवहेलनेला विरोध करणे.
म्हणूनच बघवत नाही बंडखोर द्रौपदी
कर्तव्यदक्ष जिजाऊ,अहिल्या.
प्रतिभाज्योति कवियत्री- सावित्री.
म्हणूनच काय तुझी लेखणी ओकते
काहीबाही तिला करण्या कलंकित...
'त्या गरळ ओकणाऱ्या लेखणीत'
नसावी शाई असावे गटारगंगेचे पानी...
म्हणूनच कदाचित उघडे करता
मायभगिनी,
लाजली नाही वाणी.
अरे, मोठ्ठ होत नाही कुणी
'हागणं-मुतणं, गु-मूत , शेंबूड ,बेडखा '
बिभत्स लिहून.
तू आणत राहतो नित्य तिच्या डोळ्यात पूर आणि धूर
जो जातो तुझ्याकरता भाकरी थापणाऱ्या तिच्या डोळ्यात
आणि करपते भाकरी तिची तिच्यासाहित
म्हणजे आजही......
सीता अग्नीपरिक्षा देतेच आहे.....,
मीरा विषाचा प्याला पितच आहे....,
अहिल्या शिळा होतेच आहे....,
कुंतीला 'मंत्र' मिळतोच आहे...,
पण हे पुरुषा , लक्षात ठेव,
'गृहिणी..सखी...माता..देवी.. पतिव्रता.
ह्या पदव्यांची खैरात घेऊन मखरात बसणे तिने थांबवले आहे.
तिने आकाश कवेत घेतले आहे
तुझी 'उंची 'मापली आहे!
तू मनूचे तत्व सांभाळ
ती रणरागिणी,दुर्गा,चंडी म्हणून
पेटली आहे!