वसुंधरा
वसुंधरा
विरहात कुणी प्रेयसी, जळते जशी, तशी तापते धरा ।
जणू वाट सख्याची पाहे, कधी रे येतील श्रावणधारा ।।
चमकते अंबरी वीज, गर्जती मेघ, बरसती धारा ।
न्हाऊनिया निघते धरा, फुलविते मन मयूर पिसारा ।।
ही वसुंधरा नेसुनिया हिरवा शालू सजली, नटली ।
नथ इंद्रधनूची लेऊन आली जणू सुंदरा कुठली ।।
सुस्नात कुमारी कुणी उन्हाला उभी तशापरी दिसे ।
तिज पाहुनीया मन कैसे बळीराजाचे होई वेडेपिसे ।।
घेऊन बैल आणि औत निघे शेतात बहू आनंदानं ।
भूमीत विश्वासानं, टाकी बियाणं, खुशीत येऊन ।।
गर्भार धरा जाहली, पिकं उगवली, अति जोमात ।
मन बळीराजाचं खुललं, शिवार फुललं, दिसे बहरात ।।
लेकराचा बघून चेहरा, अति हासरा, खुलली भूमाता ।
बळीराजा वंदितो तिला बाळगून हृदयी कृतज्ञता ।।