वाळवी
वाळवी
अचानक रात्री दहा वाजता मला एका पालकाचा फोन आला,"गेले काही दिवस माझा मुलगा एकटाच खिडकीच्या बाहेर बघत बसतो. दिवसभर खोलीत कोंडून घेतो. काही बोलत नाही. अभ्यासाचे पुस्तक समोर असलं तरी पान उलटत नाही. काय करावे कळत नाही." खरं म्हणजे रात्री दहा वाजता ही काय कोणी पालकांनी एखाद्या मुख्याध्यापक स्त्रीला फोन करून माहिती सांगण्याची वेळ नव्हती पण त्यांचा चिंतेचा स्वर ऐकून मी त्यांना भेटायला बोलावलं.
पालक एकदम सज्जन आणि प्रतिथयश डॉक्टर होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी चे जाळे विणलेले दिसत होते. डॉक्टर एकटेच आले होते, त्यांची पत्नी घरीच थांबली होती. एकंदरीत मुलांच्या वागणुकी वरून डॉक्टरांना काहीतरी संशय आला होता पण इतरांना सल्ला देणारी त्यांची जीभ स्वतःच्या मुलाच्या बाबतीत ते निदान करताना अडखळत होती. "दिवसभर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला तपासत असतो, जेव्हापासून समीर दहावी झाली तेव्हापासून मी त्याच्याबरोबर म्हणून जेवायला दुपारी घरी येतो. मी माझी पत्नी माझी धाकटी मुलगी आमच्या तिघांचा आता हाच दिनक्रम आहे. आलेल्या जागतिक महामारी मुळे दहावीच्या वेळेला परीक्षा झालीच नाही, अकरावी मध्ये सहज प्रवेश मिळाला, आता बारावी आहे, सगळं काही ऑनलाईन चालू आहे, तरी पण आम्ही त्याला संध्याकाळी मित्रांबरोबर भेटण्यासाठी म्हणून बाहेर जाऊ देतो. तसेच त्याच्या ट्युशन क्लास च्या परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे तिथे पण स्वतः जातो. लहानपणापासून समीर, टेबल टेनिस उत्तम खेळतो, टेबल टेनिस च्या कोचीगला म्हणून देखील तो एक तास भर जिमखान्यात जातो. दहावीच्या परीक्षेचे टेन्शन महा मारी नेत काढूनच टाकलं, त्याच्यामुळे ही मुलं थोडीशी उद्दाम झाली. माझ्या हॉस्पिटलचा पसारा फार मोठा आहे, तरीपण मी मुलं घरी असताना घरातच थांबतो." डॉक्टर युसुफ अली असगर भरभरून बोलत होते.
डॉक्टरांचा भिवंडीमध्ये मोठाच पसारा होता. अतिशय सुसज्ज हाडे, मणके, सांधेरोपण, हॉस्पिटल आणि त्यांची पत्नी रुबिना हीच स्त्री रोग तज्ञ म्हणून असणार स्त्रियांसाठीच हॉस्पिटल. अतिशय सुसंस्कृत असे मर्यादशील मुसलमान कुटुंब अली असगर यांचं होतं. दोघेही मुलं समीर आणि सोफिया अभ्यासामध्ये हुशार आणि वागणुकीला चांगलेच होते. आतापर्यंत त्यांच्याबद्दल कोणाचेच काही कंप्लेंट नव्हती. माझ्यातल्या मुख्याध्यापक जागा झाला,"मधून मधून, मुलांची बॅग आणि मोबाईल चेक करत चला. नाजूक वय आहे त्याच्यामुळे एखाद्याशी मैत्री कदाचित समीरला दुसऱ्या रस्त्याकडे नेत असेल. प्रत्येक ठिकाणी त्याचे कोण मित्र आहेत हे त्याच्या बाकीच्या मित्रांकडून जाणून घ्या. सध्या शाळा कॉलेज देखील ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला तसा मुलांवर चा कंट्रोल ठेवता येत नाही. मुले पूर्णवेळ घरातच असल्यामुळे आई-वडिलांच्या नजरेखाली ते आहेत असाच आमचा ग्रह आहे. पौगंडावस्थेतल्या जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्या कौन्सिलरला जरूर भेटा आणि मदत घ्या. आधी थोडे दिवस थांबा आणि मगच निर्णय प्रक्रिया चालू करा. त्यातून आम्ही मुलांना प्रॅक्टिकल करण्यासाठी म्हणून कॉलेजमध्ये बोलणारच आहोत तेव्हा शिक्षकांकडून पण समीरची जरूर ती चौकशी होईल." माझ्या बोलण्यामुळे डॉक्टर अली असगर थोडेफार आश्वस्त झाले आणि परत गेले.
प्रत्येक विषयाचे प्रॅक्टिकल चे चार सेशन्स ठरले होते, त्याप्रमाणे मुलांच्या बॅचेस पाडल्या गेल्या आणि त्यांना तसे कळवले गेले. पालकांच्या संमती नुसारच मुलांनी कॉलेजमध्ये यायचे होते. सगळी मुले आनंदाने कॉलेजमध्ये यायला लागली. सगळ्यांची वर्तणूक पिंजर्यातून बाहेर पडलेल्या मोकाट वासरा सारखी झाली. एकमेकांना भेटून पाहून सगळ्यांना अतिशय आनंद झाला त्यामुळे प्रोफेसर वर्गाला देखील खूप समाधान वाटले. प्रोफेसर भरभरून शिकवू लागली, कॉलेजमध्ये आनंदाने बागडू लागली हे बघून जणू काही कॉलेजच्या इमारतीला देखील नवीन पालवी फुटली.
समीर आता ठीक होता कारण डॉक्टर अली असगर यांच्याकडून मला काहीच फोन किंवा निरोप आला नाही. परंतु त्याच्या नंतर च्या झालेल्या परीक्षेमध्ये समीरचा स्कोर रसातळाला गेलेला दिसत होता. त्याला बोलून प्रश्न करण्यात आले, समीरचा अवतार विचित्र होता. वाढलेले केस, वाढलेली दाढी, खोल गेलेले डोळे, अचानक वाढलेली उंची, आत गेलेले गाल, काळवंडलेला रंग. तो फारच विचित्र दिसत होता. कौन्सिलर कडून देखील काहीही महत्वाची बातमी कळू शकली नाही. असेच थोडे दिवस गेल्यानंतर अचानक रात्री एक वाजता माझ्या डोक्यापासचा मोबाईल वाजला. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकलची प्रेलिम एक्झाम होती म्हणून मी सगळं आवरून लवकर जायचे तयारीने लवकरच झोपले होते. रात्री एक वाजता कोणाचा बर फोन? मी काहीशी नाराजीनेच फोन उचलला.
"क्षमा करा मॅडम तुम्हाला इतक्या रात्री त्रास देत आहे, मी काही मुलांची नावं तुम्हाला मेसेज करत आहे उद्या त्यांच्या बॅग तुम्ही जरूर तपासा, तुमच्या कॉलेज विषयी आम्हाला आत्मीयता आहे कारण माझी स्वतःची मुले तिथेच शिकत आहेत, आपल्याला समाजाला लागलेली हि कीड मुळातूनच चिरडून टाकायचे आहे त्यामुळे उद्या सावधगिरी बाळगा." कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. कॉलर आयडी वरून देखील मला त्यांचे नाव कळू शकले नाही.
थोड्याच वेळात माझ्या फोनचा मेसेज वरती चार मुलांची नावे झळकली. अजय म्हात्रे, सुधीर जोशी, समीर अली असगर, बिंदू खान.
माझी पार झोपच उडाली. सकाळी सात वाजताच मी कॉलेजला जाऊन पोहोचले. मुलांची यादी बघून कुठल्या ग्रुपमध्ये ही चार मुले येणार होती त्याची नीट पडताळणी केली. विशेष म्हणजे दुसर्या बॅच मध्ये एकाच ग्रुपमध्ये चौघांचीही नावं होती. प्रॅक्टिकल करताना बॅग मोबाईल सगळे बाहेर ठेवण्याची आमच्याकडे प्रथा होती . कॉलेज चे सेक्युरिटी ऑफिसर्स हे एक्स मिलिटरी ऑफिसर्स असल्यामुळे त्यांना बोलावून जाणीव दिली गेली.
एका रिकाम्या खोलीमध्ये सगळ्या मुलांच्या बॅग ठेवल्या गेल्या आणि एकेक करून सगळ्या सामानाची झाडाझडती घेतली गेली. कोणाकडे काही सापडले नाही. मला फारच बरे वाटले. पण वरील मुलांच्या सामानमध्ये एक गोष्ट समान होती. चौघांच्याही कडे टेबल टेनिस ची कव्हर घातलेली रॅकेट होती.
अनुभवी सिक्युरिटी ऑफिसर ने या चारीही रॅकेट एका मोठ्या वर्तमानपत्रावर ती ठेवल्या. एक एक करून कव्हर उघडले, कव्हर मध्ये काहीच नव्हते, मग त्यांनी रॅकेट बाहेर काढली, रॅकेटच्या वरचे लेदर चिकटपट्टीने चिटकवलेले दिसत होते, ते हळूच उघडल्यावर ती त्याच्यातून कसेतरी वाळकी पानं बाहेर पडली. कसलातरी उग्र वास खोलीमध्ये भरला. सिक्युरिटी ऑफिसर ने रॅकेटचे हँडल देखील हळूच फिरवले तर ते आतून पोकळ होते आणि ते उलटे केले तेव्हा त्याच्यातून पण कसलातरी राखाडी रंगाचा भुसा बाहेर पडला. समीरच्या रॅकेटची पण तीच तऱ्हा होती. कव्हर मध्ये पॅकिंग च्या ठिकाणी बेमालूमपणे कसल्यातरी पांढऱ्या रंगाच्या पुड्या व्यवस्थित लपवलेले होत्या. राकेट आणि हँडल हे आतून पोकळ असून त्याच्यामध्ये पण राखाडी पांढऱ्या रंगाच्या पुड्या एकाखाली एक अशा व्यवस्थितपणे बेमालूम बसवलेल्या होत्या. बिंदू तर मुलगी होती, तिच्या रॅकेट मधून सिगरेटच्या पोकळ नळ्या आणि त्याच्यात तूसायचं सामान बाहेर पडलं. ते सर्व बघून मला तर गरगरायला लागले. सिक्युरिटी ऑफिसर म्हणाले," मॅडम हा फार किमती माल है, नारकोटिक्स सेल ला आणि पोलिसांना कळवावे लागेल." झालं! आता आमच्या कॉलेजची इज्जत पण पणाला लागणार होती. अर्थात त्यात आमची काही चूक नव्हती. सुरूवातीला चारी मुलांच्या पालकांना आम्ही कॉलेजमध्ये बोलवून घेतले. न रागावता न चिडता त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. बरेचसे पालक थंड दगडाप्रमाणे बसून राहिले.
बिंदूच्या आई-वडिलांनी तर भयंकर तमाशा केला," हे असले काही तिच्या रॅकेटमध्ये असणं शक्यच नाही, तिला मुद्दाम अडकवण्यात येत आहे" असले जोरजोरात आरोप त्यांनी कॉलेज वरती केले. तिच्या मोबाईल मध्ये तर बरेचं नंबर सापडले ज्याच्या वरून कोणीतरी सतत उर्दूमध्ये तिच्याशी वार्तालाप करत असल्याचे दिसले. तिच्या मोबाईल मध्ये काही व्हॉइस मॅसेज पण होते जे संशयाला पुष्टी देत होते. मुलांच्या रॅकेटIतून सामान काढताना प्रत्येक घटनेचा व्हिडीओ आमच्या सेक्युरिटी ऑफिसर ने काढून ठेवलेला होता त्यामुळे सामान मुलांच्या बॅगेतून निघाल याची आमच्याकडे पूर्णपणे पुष्टी होती. सुधीरच्या पुस्तकामध्ये त्याच्या आई-वडिलांना माहीत नव्हते एवढे पैसे सापडले, पैसे कुठून आले हे मात्र तो सांगू शकत नव्हता.
मुले वयाने लहान असल्यामुळे त्यांना रिहॅबिलिटेशन ची जरुरी होती. आयुष्य इतक्यात संपलेलं नव्हतं पण सापडलेलं सामान अतिशय किमती असल्यामुळे ती किंमत वसूल करणार कोणीतरी त्यांना नंतर जरूर भेटणार होतं. चौकशीच्या शेवटी मात्र बिंदूच धैर्य संपलं, टेबल टेनिस चा प्रॅक्टिसला तिला कोणी तरी भेटलं होतं. सुरुवातीला जिमखान्याच्या टॉयलेटमध्ये फुकटच सिगरेट मिळत होती, थोड्याच दिवसात जेव्हा तिला चटक लागली तेव्हा तिच्याकडून पैसे वसूल करण्यात यायला लागले, एवढे पैसे घरातून आणणं शक्य नव्हतं मग ती एक रीत सर दुवा बनली, तिने अजून चार गिऱ्हाईक आणायची होती, सुरुवातीला फुकट नंतर पैशाने. बिंदु ने सांगितलेली नावं ऐकून आमच्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. लाकडं पोखरणाऱ्या वाळवी पेक्षाही वेगानी ही वाळवी समाजामध्ये पसरत होती. महामारी च्या दिवसांमध्ये मुलं घरात असताना देखील पद्धतशीरपणे त्यांच्यापर्यंत नशेच्या वस्तू पोहोचल्या जात होत्या. बिंदूचा परममित्र समीर आणि मग बाकीचे असेच या जाळ्यामध्ये अलगदपणे अडकले होते.
अजिंक्य इनामदार यांनी मुलांचा ताबा घेतला, मुलांना दूरवरच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी पालकांना विनंती केली. बारावीचं वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पालकांनी गयावया केली. वर्ष का जीवन? मोठा प्रश्न कुठला होता?
त्यातून जर मुलं पोलीस प्रोटेक्शन मध्ये कॉलेजमध्ये येऊन परीक्षा देणार असतील तरच त्यांना परीक्षेस बसू द्यायचे असे मॅनेजमेंटने सांगितले. न जाणो वसुलीच्या साठी अजून कोणीतरी कॉलेजच्या इमारतीमध्ये शिरून काही तरी विचित्र करु नये यासाठी ही दक्षता होती.
सध्या मुले पोलिसांच्या निगराणी मध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, उपचार विलंबाचे आहेत, एवढ्या लवकर असल्या सर्पाच्या वेढ्यातून सुटणे शक्य नाही तरीपण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
सध्या मुले अभ्यास पण करत आहेत त्यांना बाकी ची सामग्री पॅरेण्टवॉच सकट देण्यात आलेली आहे.
सर्व पालकांनी सावधान, तुमची मुलं काय करतात हे मधून-मधून तपासून बघत राहा.