ऊसाचा संसार
ऊसाचा संसार
ऊस होता गोरा गोमटा रुबाबदार . उंच होता छान .
त्याला दोन मुले झाली मोठा मुलगा गुड आणि धाकटी मुलगी साखर .
साखर दिसायला गोरी गोमटी आणि सुंदर . स्वभावाला पण गोड तिच्यात कोणतीच कमी नव्हती .ती खुप मनमिळाऊ जिथे जाई तिथे मिसळून जाई . ती कितीही गर्दीत असली तरी तिला शोधणे अवघड नव्हते .
गुड मात्र ओबडधोबड काला कलुंदर स्वभावाला चिकट कोणासमोर गेला की तो संकट वाटे . त्याला वाटले आपणही साखरेसारखं इतरात मिसळावे पण गुळाला ते जमलंच नाही .
ऐक दिवस साखरेचे रव्यावर प्रेम जडले . बापाने ही आनंदाने लग्न लावून दिले . मग तिला ही एक मुलगा झाला तिच्या सारखाच गोरा गोरा त्याचे केले बारसे व नाव ठेवले ' शिरा '.
आता उसाला गुळाची काळजी वाटू लागली . त्याला रंग ना रूप. त्याच्यासाठी मुलगी कशी आणि कुठे शोधू . ऊस नेहमी याच काळजीत असायचा . एके दिवशी त्याचा मित्र भेटला त्याचे नाव होते तूप . त्याने उसाला काळजीचे कारण विचारले . त्याने त्याला गुळाबद्दल सांगितले .
तुपाने सुचविली गव्हाची धान्य कुळातील उंच घराण्यातील मुलगी . तो थोडी लठ्ठ आणि जाडजूड . रुपाला शोभेल असं तीच नाव 'भरड '
दोघांची गुण जमले मग ऊसाने थाटामाटात गुळाचे लग्न करायचे ठरवले . किचन ओटा बुक केला स्वयंपाक घर सजविले . तूप 'भरड ' कढईत घेऊन गेला . तिथे तिचे खरपूस मेकअप केले . भरड ही लाजून गुलाबी झाली
गरम पाणी कढईत शिरले हे बघून भरड जास्तच शराबी झाली . गुळाला ही आमंत्रित केले गुळाने पण कढईत प्रवेश केला . मनाने दगड असलेला गूळ भरड ला पाहून लगेच वितळला . उकळत्या रुपात मंगलाष्टके झाली .
काजू बदाम च्या अक्षदा पडल्या.
भटजीने कढईवर झाकणं ठेवायला सांगितले . त्यांचे मिलन झाले प्रेमाचा सुगंध पसरला . सर्वांच्या नजरा कढई कडे गेल्या गूळ आणि भरड ला एक छान सुंदर गोड अशी मुलगी झाली . थाटामाटात बारसे केले व नाव ठेवले "लापशी"…