उन्हाळा धमाल
उन्हाळा धमाल
उन्हाळा आला की वेध लागतात ते कोकणात जायचे. आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात जायचो. धुळीने माखलेली, चाकरमान्यांनी गच्च भरलेली एसटी गावात शिरली की मन आनंदाने भरून जायचे.टुणकंन उडी मारुन आजू बाजूचा परिसर डोळ्यात साठवायचा. कधी एकदा मामाच्या घरी जातो असे व्हायचे मामा स्टॅंडवर आलेलाच असायचा. दारात आजी आणि मामी वाट बघत असायच्या.मामा ची मुलेहि आनंदाने उड्या मारीत यायची.
आजी तोंडावरुन प्रेमाने हात फिरवायची.मामी पाणी आणायची.विहिरीचे माठातले पाणी पिऊन मन तृप्त व्हायचे. जेवणात खास आमरस पूरी,वालिची,फणसाची भाजी, आणि उकडा भात.चवच वेगळी लागायची. दुसरया दिवशी पासुन गाव हिंडायला सुरुवात.पहिल्यांदा देवळात जायचे. स्वता कलेल अबोलीच वळेसर देवीला अर्पण करताना वेगळेच समाधान वाटायचे. मग कुठे कैऱ्या गोळा कर, आंबे पाड, काजुचे बोंडू खा, करवंदे तोड, राताम्बे खायचे, फणसाचे गरे खायचे. दुपारी नदीत पोहण्याचा कार्यक्रमही व्हायचा.
दुपारच्या जेवणात ताजे मासे असायचे. नुसत्या वासानेच पोट भरायचे. संध्याकाळी नदीवरुन मावळत्या सूर्याचे विलोभनीय दृश्य पाहायचे.
कधी समुद्रावर फिरायला जायचे. वाळूचे किल्ले बनवायचे. भेळ खायची बर्फ़ाचे गोळे खायचे. खूप मजा यायची. रात्री अंगणात तारे बघत आजीच्या मांडीवर झोपून भूताखेताच्या गोष्टी ऐकायच्या आणि मग झोपेत घाबरुन उठायचे आणि परत आईच्या कूशीत शिरायचे.
आमच्या मुलींचे खेळही वेगळे. माडीवर भातुकलीचे खेळ रंगायचे. अंगणात थिकरी खेळायचे. आई आजी मामी पापड, कुरडया, आंबापोळी, फणस पोळी करायच्या.त्यांना मदत करायची. बाबा मामाला घर नीट करायला, लाकडे भरायला मदत करायचे. म्हणजे पावसात चिंता नाही.
कोकणात ऊन्हाळा खूप कडक असायचा. पण ते रणरणतं ऊन कधी जाणवलेच नाही. घामाच्या धारान्चेही कधी काही वाटले नाही. एसीची गरजही वाटली नाही.
बघता बघता परतीचे दिवस यायचे. मन भरून यायचे. पण ऋतुचक्राप्रमाणे चालावेच लागते. मग जड मनाने आम्ही मुंबईला परतायचो. आठवडाभर गावच्या आठ्वणीच्या गप्पा रंगायच्या आणि पुढल्या ऊन्हाळ्याची वाट पाहायची.
असा हा उन्हाळा हवाहवासा वाटणारा. कोकणची आठवण करुन देणारा.