सवयी
सवयी


पाहिलीची मुले लहान आहेत. त्यांना आईबाबा हवे असतात. बाईंनी कितीही प्रेम लावले तरी ठरविक मुले रडतातच.. मग त्यांना शांत करण्यात माझा खूप वेळ जातो. चाळीस मुलांना शिकवायचे असते.
प्रत्येक मुलाची खोडी वेगळी आहे. मला मुले फार लवकर समजतात. त्यांची टेंडन्सी समजते. गेली 33 वर्षे या क्षेत्रात आहे.
माझी दोन नातवंडे या मुलांपेक्षा मोठी आहेत. तीन लहान आहेत.
त्यामुळे मूल मला चटकन समजते. हे सांगण्या मागचा एकच उद्देश.. जर कोणी नवीन असेल तर हे आपल्याला उपयोगी पडेल.
मुले शाळेत येतात. त्यांना ओळीत बसवण्यापासून शिस्त लावावी लागते. अक्षराचे वळण, त्याच ओळीत, त्याच जागी, त्याच पानावर कसे लिहायचे हे सर्व सांगावे लागते. शिवाय त्यांचा मूड सांभाळावा लागतो.
आपण पहातो यांना किती कमी अभ्यास असतो. त्यांना तो पण नको असतो. कोण म्हणते "बाई, मी घरी करतो," कोण म्हणते "बाई, मी एवढेच लिहणार " कोणाला तर अजिबातच वही बाहेर काढायची नसते. काही वही काढून फक्त पसारा करून ठेवतात. आपल्या वस्तू कुठेही टाकून देतात.
आज तर मधली सुट्टी झाली. त्यांना ओळीत बसवले. डबे दिले. मुलांनी सुरुवात केली मग मी डबा खायला गेले.
पण आल्यावर पाहिले तर खूप सांडवले होते. मग काय ते भरून घेण्यात पुढील अर्धा तास गेला.
बर सकाळी आले मुले की सुरुवात होते सु ला जाऊ? मग मी कसे करू, कसे शिकवू... जरा मुलांच्या कलेने, जरा शिस्तीत मुलांना घेते.
जरा मुलांना या साध्या गोष्टी समजून सांगून पाठवले तर शिक्षकांचा भार कमी होईल. मुले मारामारी करतात. जर कोणाला इजा झाली तर केवढ्यात पडायचे. मुलांना समजत नाही आपण ढकलले तर त्या मुलाला लागेल. सर्वच लहान आहेत.. त्यांना पालकांनी व शिक्षकांनी समजून सांगावेच लागणार आहे.
रोज तीन मुले रडत असतात.. त्यांना खूप समजून घ्यावे लागते. रोज नवे काहीतरी खेळ घ्यावे लागतात.खाऊ द्यावा लागतो. गोष्टी, गाणी घ्यावे लागतात. आता तर मोबाईल वर गाणी लावा असे मुलंच सांगतात. त्यांची पसंती लावावी लागते. ती रमतात, नाचतात. मजा घेतात. आपण फक्त लक्ष ठेवायचे.हल्ली मोबाईलचा जमाना आहे, आपणही आपले बोलणे कमी करून मग मोबाईल वर गाणी, गोष्टी, पाढे, पाठ असे बरेच काही घेवू शकतो...
चला तर मग आपल्या या सर्व गुणी बाळांना समजून घेऊया.