रंग होळीचा... नवजीवनाचा
रंग होळीचा... नवजीवनाचा
"रंग बरसे..."या गाण्यावर धुंद होऊन नाचणाऱ्या परीकडे कौतुकाने बघत समीर आणि सिया रंगोत्सव साजरा करून घरी परतत होते.समीर सियाची एकुलती एक लाडकी परी अगदी जीव की प्राण होती त्यांचा...लग्नानंतर दहा वर्षांनी अथक प्रयत्नानंतर परीचे आगमन झाले होते आणि दोघांच्या आयुष्यात सुंदर रंग भरले होते.परीला रंगांची खूप आवड होती ...लहान वयातच परी छान छान चित्रे काढून सगळ्यांचे मन मोहवत होती.तिचे रंगात हरखून जाणे बघून समीर सिया अगदी आनंदात रंगून जात...
आणि अचानक काळाने घाव घातला...गाडीला मोठा अपघात झाला...समीर कायमचा दोघींना सोडून गेला आणि परीचे डोळे गेले... चिमुकल्या परीच्या जिवनात आता फक्त काळा रंग भरून राहिला होता.. रंगीबेरंगी आयुष्य जगणारी परी आता फक्त आणि फक्त अंधार अनुभवत होती... सिया कशीबशी आपले दुःख विसरून परीला सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.रंगांचे खूप आकर्षण असणाऱ्या परीच्या आयुष्यात पुन्हा एकदा रंग भरले जावे ही तिची प्रार्थना देवाने ऐकली...
एका देवमाणसाचे डोळे परीला मिळाले होते...आज परी पुन्हा हे जग बघणार होती ! सिया खूप आनंदात होती.तिच्या लाडक्या परीच्या आयुष्यात पुन्हा एकदा रंग भरणार होते...तिच्या रंगीत स्वप्नांना पुन्हा पूर्ण करण्याची संधी तिला देवाने दिली होती.परीला तिचा आवडता लाल रंग सगळ्यात आधी पाहायचा होता...लाल रंगाची फुलं, फुगे, लाल ड्रेस, लाल बाहुली हे सगळे परीच्या प्रेमळ नजरेसाठी आतुरलेले होते. परीचे जीवन पुन्हा एकदा रंगले होते..