पावसाळी पिकनिक
पावसाळी पिकनिक
सहलीचा दुसरा दिवस
रात्री बारा एकच्या नंतर सगळ्याजणी झोपल्या.
नवीन ठिकाण, परकी जागा, त्यामुळे बहुतेकींना ऑन ऑफ झोप लागली. मी देखील रात्री दोन पर्यंत जागीच होते.
सकाळी उठल्यावरती आपापली अन्हिके उरकून चहा कॉफी झाली. आणि सगळ्याजणी तयार होऊन खाली नाश्त्यासाठी उतरल्या.
आजच्या नाश्त्याला लुसलुशीत जाळीदार घावन आणि चटणी असा बेत होता. सगळ्यांना मनापासून आवडला, आणि मग त्या नाष्ट्यावरती नवऱ्याचं नाव न घेता उखाणे घेण्याची सुरुवातच झाली.
जसं की
शिर्क्यांच्या माहेरामध्ये घावन
झालेत जाळीदार
सिद्धलेखकांची ट्रीप
झाली खुमासदार हा उखाणा मी घेतला
माहेरच्या पंगतीत घावन केले खास
किरण देते उज्वलाला घास
हे नाव अल्काने घेतले
आज सकाळी नाश्त्याला केले घावन अन सख्यांच्या प्रेमाला आले उधाण हे असं नाव अर्चना अंबासकर ने😃 घेतले
तसे आदल्या दिवशी देखील आमचे जेवणापूर्वी वदनी कवळ घेता एकदम एका सुरात झाले होते, आणि शाळेतील आठवण आली.
मग एक एकीने हिरी हिरीने नाव घेतली.
आणि मग निघाली आमची जत्रा कोंडेश्वराच्या दर्शनाला, पुन्हा बस मध्ये 15 जणी बसलो.
मागच्या भागांमध्ये एकीचा उल्लेख राहिलेला आहे ती म्हणजे
"स्नेहा कडव" ती वांगणी वरून येऊन आपल्या ट्रिपमध्ये सामील झाली होती .तिला बराच वेळ पिकनिकचा स्पॉट म्हणजेच माहेरवाशीन बंगला मिळत नव्हता, अक्षरशः परत जावे असा विचार तिने केला. पण तिला हेंद्रे पाडा सांगितल्यानंतर ती बरोबर आली.
एक दिवस आदल्या दिवशीचा आनंद तिने देखील आमच्याबरोबर घेतला आणि मुक्कामी न राहता पुन्हा ती वांगणीला गेली .
प्राची गडकरी चा कुठेतरी कार्यक्रम किंवा रियर्सल असल्यामुळे ती देखील सकाळी लवकर उठून गेली मग आम्ही राहिलो 15 जणी
मग आमची फौज निघाली कोंडेश्वराच्या दर्शनाला!
कोंडेश्वर यापूर्वी देखील एकदा मी पाहिलेला होता, पण लक्षात नव्हते.
तिथे गेल्यावर आठवण झाली. गच्च झाडी आहे, धबधबा आहे, वाहती नदी आहे, आणि शंकराची स्वयंभू पिंड आहे म्हणजे थोडीशी छोटीशी गुहा आहे आत मध्ये पिंड आहे शेजारी धबधबा वाहतो म्हणजे गंगा हा बदलापूरचा प्रसिद्ध कोंडेश्वर चा धबधबा वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध ,तेथे बरेच बुडून मरण पावतात. अर्थात चूक माणसांची देखील आहे. तुम्ही दारू पिऊन जाणार आणि पाण्याचा अंदाज न येता देखील उड्या मारणार, तर शेवटी काय होणार ?नको तेच होणार! मागच्या वेळी आम्ही पिकनिकला गेलो तेव्हा तर तेथे पोलीस बसवलेला होता. आता पण धबधब्याजवळ जाण्यासाठी चान्स नाही. तरी पण बरेच लोक उतरले होते, आम्ही आपले दुरून दर्शन घेतले. कालच पाण्यामध्ये डुंबलो होतो .
त्यामुळे आज काही भिजण्याची हौस नव्हती. मोठी गाडी तिथपर्यंत जात नाही किंवा आपल्या गाड्या जाऊच देत नाहीत, मागच्या वेळी देखील आम्ही रिक्षा करूनच गेलो होतो.
एका ठराविक ठिकाणी आपल्या गाड्या उभ्या करून, तिथल्या स्थानिक रिक्षा घेऊन जावे लागते. माणसी तीस रुपये दिले ,दर्शन तर छान झाले.
नुकताच श्रावण सुरू झालेला असल्याने लोकांची वर्दळ होती. तिथून परत फिरलो आणि पावसाने गाठले, म्हणजे अगदी धो धो आला नाही पण शिडकावा मात्र केला, काल ज्या पाण्यात उतरल्या नव्हत्या, भिजल्या नव्हत्या, त्यांची देखील भिजायची हौस आज पावसाने भागवली. आणि सगळ्यांवरती थोडा स्प्रे मारला जेव्हा धो धो पडला तेव्हा आम्ही आडोशाला उभे राहिलो होतो
मग पुन्हा आपले बॅक टू पॅव्हेलियन म्हणजेच माहेर वाशिण बदलापूर
काय झाडी!
काय डोंगर!
काय नदी!
आणि काय तो आमचा सिद्धलेखिकांचा थाटमाट!
समद कस एकदम ओके मध्ये.
********************
परत बंगल्यावरती आलो, आणि पुन्हा एकदा जेवणाचा थाटमाट !
आज आम्ही मेनू मध्ये मोदक सांगितले होते. त्याप्रमाणे मोदक तर मिळालेच, पण सरप्राईज पुरणपोळ्या देखील मिळाल्या .
गरमागरम आणि लुसलुशीत पुरणपोळ्या ,पातळ पारी असलेले, गोडीला व्यवस्थित असलेले छान उकडीचे मोदक, वालाचं बिरडं ,असा छान मेनू होता.
जेवण झालं! जरा वेळ वामकुक्षी करण्यासाठी सगळ्या जणी वरच्या मजल्यावर गेलो, आणि अक्षरशः सगळ्यांना चांगली झोप लागली, डुलकी लागली, "अगदी पुरणपोळी अंगावर आली"
एक तर कालचे जागरण
आणि आज पुन्हा पुरण
त्यामुळे चांगली सुस्ती आली.
चार साडेचार वाजता खालच्या मंडळींना चहासाठी आवाज दिला. आम्हाला निघायच आहे, चहा करा!
त्याच्या आधीच, त्या पाच जणी डॉक्टर भगिनी, टाटा! बाय-बाय करून गेल्या देखील !
मग आम्ही चहापान केले आणि निघालो.
बॅगा भरूनच चहा प्यायला खाली आलो होतो. प्रभाताई आम्हाला रोडवर गाडीपर्यंत सोडायला आल्या. आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
येताना मात्र जाता एवढा उत्साह नव्हता.
आता सगळ्या नरम गरम झाल्या होत्या.
थोडं फार मी, अलका, आणि आदिती तिघींनी गाणी वगैरे म्हणून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. पण मैत्रिणीनी आपापल्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसणे पसंत केले .
डोंबिवलीकर सख्यांना डोंबिवली मध्ये सोडले,
टाटा बाय 👋 केलं .
आणि मग आम्ही आमच्या ठाणे मुक्कामी पोहोचलो, आणि सगळ्या जणी रीक्षेत बसून आपापल्या जागी निघेपर्यंत पद्माताई नी आपली कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली ,आणि एवढ्या रात्री उल्काला शहापूरला पाठवण्याऐवजी आपल्या स्वतःसोबत घरी घेऊन गेल्या.
*********************
अजून एका व्यक्तीविषयी लिहायचे राहिले ,त्या म्हणजे "प्रभाताई शिर्के"
या प्रभा ताई देखील एक अजब रसायन आहेत. सकाळी जेव्हा गेलो तेव्हा मोत्यांच्या नथ ,बांगड्या, गळ्यातला हार ,जरा वेगळ्या पद्धतीच्या डिझाईनचे सारं त्यांना खुलून दिसत होतं.
नंतर आमच्याबरोबर त्या नदीकाठावर देखील आल्या.
तिथे आमचे व्हिडिओ काढले, काठावरून आम्हाला बक-अप केले.
संध्याकाळी जेव्हा बर्थडे पार्टी मध्ये सगळेजण नाचले, तेव्हा त्या देखील छानसा पार्टी गाऊन घालून आमच्याबरोबर ती नाचल्या. ते त्यांचे वैशिष्ट्य आहे.
नाहीतर फक्त यजमान म्हणून वावरणे ,आणि चला या "लोकांचा आणि आपला किती दीड दिवसाचा संबंध! पुढे कधी त्यांचा आपला संबंध येणार आहे का? असा विचार न करता त्या प्रत्येक गोष्टीत आनंदाने सामील झाल्या.
इतर ठिकाणी आपण जेव्हा पिकनिकला जातो, तेव्हा त्यातील आयोजक आपल्याबरोबर असे सामील होत नाहीत.
एकंदरीत आमची एक रात्र दोन दिवस अशी बदलापूर माहेर वाशिण या स्थळी गेलेली सहल उत्तमरीत्या पार पडली.
आणि ही "पाचा उत्तराची कहाणी
साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.