ओवी
ओवी
आज मी *ओवी* बद्द रचनेबद्दल लिहिणार आहे .
ओवी म्हणजे जुन्या काळातील अशिक्षित, परंतु ज्ञानाचा साठा असलेली स्त्री, आपल्या पारंपारिक गाण्यांमधून ओवी म्हणायची, आणि आपले मनोगत व्यक्त करायची.
त्याकाळी सासरी असलेल्या मुली लहान असायच्या, पण त्यांना प्रचंड प्रमाणात जाच केला जायचा, त्रास दिला जायचा.
अगदी शारीरिक मानसिक छळ व्हायचा. उपाशी ठेवण्यापासून, ते मारहाण करेपर्यंत सार काही व्हायच.
अशी त्यांची मुस्कुटदाबी होत असताना कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे.
तरच मन शांत राहील, यातूनच ओवीचा जन्म झाला असावा.
कारण जात्यावर बसून गाणं म्हणायला काही कोणाची ना नसायची.
जसं आता आपण देखील काम करताना संगीत ऐकतो, तसाच तो एक त्यांच्या कामांमध्ये विरंगुळ्याचा भाग असायचा.
आता जाती ही गेली आणि ओव्या ही गेल्या .
आपल्या ओव्यांमध्ये स्त्रियांना माहेरचा अभिमान असायचा,
सुरुवातीच्या काळात सारखी माहेराची आठवण येत असेल. त्यामुळे त्या ओव्या माहेर वरतीच असायच्या.
माझा ग बाप मोठा
त्याचा चौसोपी वाडा
लवकर मुराळी धडा
बापराया
माझा ग भाऊ मोठा
त्याची आभाळाची माया
कधी येशील भेटाया भाऊराया
माझ्या ग माहेरात
राजा सर्जा ची बैल जोडी
मुराळी पाठवा गाडी
भाऊराया
माझी ग भोळी माय
वाट पाहते दारात
कधी येतील घरात
लेकी बाळी
ही सासरी गेल्यावरची सुरुवात आहे. त्यानंतर हळूहळू ती मुलगी तेथे रुळते.
एखादे मूळ बाळ होते आणि मग सुरू होते मुलाचे कौतुक.
माझा ग तनु बाळ
खेळाया गेला दूरी
त्याच्या हातावर पुरी
कोणी दिली
माझा ग तनु बाळ
खेळून येईल
विसावा देईल भागल्यांना
तनु ग बाळासाठी
नवस केले जागोजागी
आत्या मावश्या फेडू लागी
नवस आपले आपले
माझा ग तनु बाळ
माझा तो मला हवा
देवाजीने द्यावा जन्मभरी
तोपर्यंत पती राजाशी पण चांगली ओळख झालेली असते.
त्याचा स्वभाव आवडीनिवडी त्याला काय हवं काय नको माहित पडतं.
मग कधी कधी ती त्याला ठणकावून सांगते.
की जितका तुमचा रुबाब बाहेर आहे ना! तितकाच माझा घरात आहे .
तुम्ही हंडा मी परात
तुम्ही बाहेर मी घरात
बाई सवची दोघं
तुम्ही दौत मी लेखणी
तुम्हा परास मी देखणी
बाई सवची दोघं
पुढे भावाचा संसार वाढतो, त्याला देखील मुले बाळे होतात, आणि थोडेसे बहिणीकडे दुर्लक्ष होते, मग ती बहीण ओवी म्हणते
वळवाचा पाऊस
पडून ओसरला
भावाला झाल्या लेकी
मग बहिण विसरला
मग पुढे ती सासूच्या भूमिकेत येते आणि मग पहिले पाढे 55 सुरू होतात थोडासा काळ बदललेला असतो मारहाण होत नाही पण शाब्दिक टोमणे मात्र चालू असतात
आजकालच्या पोरी
नाहीत बाई कामाच्या
सुना करून आणल्या
लेकी आहेत भावाच्या
मग आमच्या वेळी असं होतं आमच्या वेळी तसं होतं हे सुरू होतं.
आजच्या ग पोरी बाळी
नेसत नाही लुगडं
पुजत नाही सुगड
संक्रांतीला
आजच्या ग पोरी बाळी
नेसतात पॅन्ट
घालीत उंच बूट
घसरून पडती
आजच्या ग पोरी बाळी
कापितात केस
त्यांच्याकडे बघून
तोंडाला येतो फेस
आजच्या पोरी बाळी
करतात नोकरी
सासु करते चाकरी
सुनबाई ची
काळ बदललेला असतो, आता मुली स्वावलंबी झालेल्या असतात .नोकरी करतात ,त्यामुळे त्यांचं राहणं, खाणं ,वागणं, पेहराव सारच सासूला खटकत असतं.
कारण तिने आपल्या सासूकडे कधी डोळे वर करून देखील बघितलेलं नसतं, पण ही आजकालची पोरगी मात्र खुशाल "आई आज माझ्या ऑफिसमध्ये एकीचा बर्थडे आहे, पार्टी आहे यायला उशीर होईल तेव्हा आज बाबुला तुम्हीच रात्री दहापर्यंत बघा" अशी खुशाल हसत हसत फर्मान सोडून जाते.
ही बिचारी दोन्हीकडे पिसलेली असते,
कधी सुनेच्या रोलमध्ये तर आता सासूच्या रोलमध्ये!
तिला काही वर तोंड करून बोलायची सवयच नसते. पण पाठीमागे मात्र गाँसिपिंग चालू असते.
असो पुन्हा यांना जोडणारा दुवा म्हणजे हिचा पोरगा आणि तिचा पोरगा.
मग ती सासू विचार करते सून खुश तर माझा मुलगा खुश शेवटी आपल्या मुलाच्या सुखासाठी सुनेला देखील कशीही असली तरी चांगलं म्हटलं पाहिजे मग ती म्हणते
आपल्या त्या सोन्यासाठी
चिंधी करावी जतन
आपुल्या त्या लेकासाठी
सून म्हणावी रतन(रत्न)
सासू पुन्हा एकदा आपल्या जुन्या काळात जाते आणि
" आडगुळ मडगूळ रुप्याच
कडबुळ
सोन्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट लावू "
हे सुरू होतं आणि हेच साऱ्या घरात नातं बांधून ठेवत
(काही ओव्या पारंपारिक आहेत तर काही ओव्या स्वरचित आहेत)