नवी दिशा
नवी दिशा
अनिताने घरात पाय ठेवताच सुमन बोलली झालं ना तुझ्या मनासारखं. नको होतं तुला मूल देव जाणे तो मुलगा होता की मुलगी. आई तिची तब्येत तरी बघ आणि तिने मुद्दाम केले आहे का हे? तिला पण हवे होते हे बाळ. सुयश बोलला. हवे होते ना मग नीट काळजी नाही घेता येत का? आधीच दोन मुली डोक्यावर घराला वंश कधी मिळणार कोण जाणे. सासूचे हे बोलणे ऐकून अनिताचे डोळे भरून आले. तिला 10 वर्षांची अंजली आणि 8 वर्षांची नेहा होती. आता सासूला मुलगाच हवा होता. त्यामुळे अनिताला तिने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करून दिले नव्हते. मुलांमध्ये अंतर हवे म्हणून अनिता गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. पण त्या गोळ्या अतिप्रमाणात झाल्यामुळे अनिताची तब्येत अलीकडे बिघडत चालली होती. सतत डोकं दुखणं, ऍसिडिटी असे त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट होत होते. सुमनताई मात्र मुलाचा ध्यास धरून बसल्या होत्या.
आता अनिताला दोन महिने झाले होते पण अचानक पोटात दुखू लागले आणि रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात झाला होता. डॉक्टर म्हणाले होते की जास्त प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर कधी कधी गर्भाशयाचा कन्सरही होऊ शकतो. पण अडाणी आणि रीतीरिवाजाच्या जोखडात अडकलेल्या सुमनताईना हे कोण समजवणार? त्यात सुयशच्या बाबांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तो आईला जास्त काही बोलू शकत नव्हता. खरंतर अनिता आणि सुयशला तिसरे मूल नको होते पण आईपुढे काही चालत नव्हते. सुमनताई आपल्या दोन नातींसोबतही तितक फारसं प्रेम दाखवत नसायच्या.
असेच पाच-सहा महिने गेले अनिता आणि सुयशने एक शेवटचा चान्स म्हणून मुलाला जन्म द्यायचा असे ठरवले. अनिता यावेळेस काहीही होवो तू काळजी नको करुस आईचा रोष पत्करावा लागला तरी चालेल पण आपण आता थांबू इथेच सुयश म्हणाला. मला तर काही समजत नाही आज मुलगा- मुलगी असा भेद कोणी करत नाही पण हे आईंना कोण समजावून सांगणार, अनिता बोलली. अनिता ते जाऊ दे तुझी तब्येत महत्वाची आहे बास आता. आपला निर्णय आपण आईला सांगू, सुयश बोलला. अनिताला आता तीन महिने झाले होते पण तब्येत नाजूक होती तिची. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले होते. सुयशने सगळ्यावर कामाला बाई लावली होती तो जातीने अनिताकडे लक्ष देत होता. हेही सुमनताईंना आवडत नव्हते आम्ही पण मुलं जन्माला घातली पण इतके नखरे नाही केले ना आमची कोणी काळजी घेतली असं त्या सतत अनिताला बोलून दाखवत असत. पण सुयश अनिताने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होते.
अनिताचे नऊ महिने भरत आले होते एक दिवस तिच्या पोटात खूप दुखू लागले. सुयशने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. अजून नऊ महिने पूर्ण झाले नव्हते पण बाळाने स्वतःच्या गळ्याभोवती वार गुंडाळून घेतली होती म्हणून लगेचच अनिताचे सिझेरियन करणे गरजेचे होते त्यात तिची तब्येत नाजूक बनली होती. सुयशने डॉक्टरांना तुम्हाला योग्य वाटेल ते करा असे सांगितले. अनिताचे सिझेरियन झाले आणि यावेळेसही तिला मुलगी झाली. खरंतर अनिताला आता कुटूंब नियोजनाचे ऑपरेशन करायचे होते पण डॉक्टरांनी तिला परवानगी नाही दिली. सुमनताईंना वाईट वाटले की यावेळेसही मुलगा नाही झाला. त्या अनितालाच दोष देत राहिल्या. घरी आल्यावरसुद्धा त्या अनिताला घालूनपाडून बोलू लागल्या. अनिता गप्प राहून सगळं सहन करत होती. एक दिवस असेच सुमनताई कशावरूनतरी अनिताला बोलत होत्या. त्यात परत मुलाचा विषय आला. पुन्हा सगळं खापर अनितावरच! हे सर्व पाहून सुयशने एक निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःची पुरुष नसबंदी करून घेतली. अनिताला इथून पुढे त्रास नको आणि आईचे कुचकट बोलणेही नको म्हणून त्याने हा निर्णय घेतला.
सुयश घरी आला त्याने आई आणि अनिताला समोर बोलवून सांगितले तो म्हणाला, आई, अनिता आणि मी आम्ही दोघांनी आता मुलाचा विचार बंद केला आहे. आहे त्या तीन मुली आम्हाला मुलासारख्याच आहेत आणि मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असते त्यामुळे उगाच अनिताला दोष देऊ नकोस. आम्हाला मुलगा नाही याची आम्हाला अजिबात खंत वाटत नाही. म्हणूनच मी माझी स्वतःची नसबंदी करून घेतली आहे. काय वेडा झालास का तू? काय बोलतोस तू समजते का तुला सुमनताई बोलल्या. आई मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. अरे तुझे पुरुषत्व गमावलेस तू. करायचे तर अनिताचे ऑपरेशन करायचे ना स्वतःचे का नुकसान करून घेतलेस? सुमनताई रागात बोलल्या. आई हा निव्वळ गैरसमज आहे की पुरुष नसबंदी केली की पुरुष कमजोर होतो. पुरुषांनी नसबंदी केल्यास पुरुषांच्या शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही आणि अनिताची मला काळजी आहे तिला त्रास मी नाही होऊ देणार. तू पण मुलाचा हट्ट आता सोडून दे आई, सुयश म्हणाला.
आपल्या मुलाचा ठाम निश्चय बघून यावर सुमनताई काहीही बोलल्या नाहीत. अनिता मात्र आपल्या नवऱ्याच्या अनोख्या रूपाकडे अभिमानाने पाहत राहिली. सुयशने तिचा विचार केला यातच सगळं काही तिला मिळाले. असा नवरा आपल्याला मिळाला याचा तिला खूप अभिमान वाटला.