गुरु महिमा
गुरु महिमा
एका शिष्याची आपल्या गुरुंवर अपार भक्ती होती.गुरुंची कृपादृष्टी त्याच्यावर असल्याने दोघेही इतके तादात्म्य पावले होते की जेव्हा शिष्य चालत असे त्यावेळी त्याच्या शेजारी गुरुंची पावलं उमटत असत.
एकदा शिष्यावर भयंकर मोठं संकट आलं.शिष्य गडबडून गेला.पण यावेळी नेहमी साथ करणारी गुरुंची पावलं दिसत नव्हती.शिष्य उदास झाला.प्रत्येक वेळी आपल्या बरोबर असणारे गुरु संकट आल्यावर मात्र शेजारी नाहीत या विचाराने शिष्याला खूप वाईट वाटले.
जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसं तसं संकटही नाहीसं झालं.मात्र आपल्या गुरुंचं वागणं शिष्याला खटकत राहिलं.बरेच दिवस झाले तरी शिष्य आपल्या गुरुंना भेटायला गेला नाही.गुरुंनी त्याची वाट बघून शेवटी बोलावणं धाडलं.शिष्य आला पण त्याची मुद्रा उतरलेली होती.गुरुंनी त्याला कारण विचारले.शिष्य तक्रारीच्या सुरात म्हणाला,'गुरुवर्य, तुम्ही कायम माझ्या सोबत असता पण जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा मात्र तुम्ही मला सोडून गेलात!'
'कोणी सांगितलं मी तुला सोडून गेलो म्हणून?'गुरुंनी प्रश्न केला.
'नेहमी आपल्या दोघांची पावलं बरोबर दिसतात पण जेव्हा संकट आलं तेव्हा मात्र एकच पावलांची जोडी दिसत होती.'शिष्य रुसलेल्या स्वरात म्हणाला.
'अरे वेड्या,ती पावलं तुझी नव्हती,ती पावलं माझी होती.तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला उचलून हृदयाशी धरलं होतं.'
असा असतो गुरु महिमा.