आभास
आभास
आजच्या सोशल मीडिया च्या काळात खरी नाती हरवत जाताहेत. ह्या आभासी दुनियेचा वरकरणी मखमली मुलामा सर्वांनाच हवाहवासा झालाय. जिथे जाणीव आहे,.. पण गंध नाही, स्पर्श नाही, चव नाही, सहवास नाही... स्वयंकेंद्रित व्यक्ती एकटाच गर्तेत एकाकी गरगरत असल्यागत. जगाला जवळ आणलेल्या ह्या टेक्नॉलॉजीचा काही अंशी फायदा वगळता, ह्याने माणसाला माणसापासून दूरच केलंय खरं तर. जिथे कुटुंब व्यवस्थाच हादरत आहे तिथे मैत्रीची पण काय बिशाद!.. मान्य, आजवर लाँग डिस्टंस रिलेशनशीप्स ह्याच आधारे सुसह्य असतीलही. पण त्यात संवेदना हरवल्या आहेत. भावनांना मोकळीक आहे, पण त्या पोकळ भासतात. व्हर्च्युअल हॅपिनेस आहे, पण बेरंगी... असं म्हणतात, सुख वाटल्याने वाढतं अन् दुःख वाटल्याने कमी होतं. ही मुभा पूर्णतः इथे कुठे सापडतच नाही. सुंदर छायाचित्रणाचा देखावा करण्याची चढाओढ नुसती हाताशी लागते. ना सुख द्विगुणित झाल्याचा आनंद ना दुःख हलकं झाल्याचा दिलासा,.. उलट संकुचित वृत्तीची अपराधी सल मात्र बोचून जाते भानावर येईस्तोवर. वाचल्यावर एखाद वेळेस पटणार नाही,.. तेव्हा काही क्षण डोळे मिटून स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात डोकावून या. मग सांगा दुधाची तहान ताकावर भागवत तर नाही आहोत ना आपण?... आणि तरीही विपर्यास पहा आत्ताच्या सोशल डिस्टंसींग च्या परिस्थितीत ही टेक्नॉलॉजीच आधारस्तंभ वाटतेय. पण माणसाचा रितेपणा भरून काढू शकते?.......