शिक्षण हक्क कायदा
शिक्षण हक्क कायदा
शिक्षणाचा खरा अर्थ
विद्यार्थ्यांना कळला पाहिजे
प्रत्येक वर्गाला किमान एक
शिक्षक तरी मिळाला पाहिजे
शिकणारे गरजवंत, शिकवणारे
मात्र वेठबिगार आहेत
विचारायचीच गरज नाही
त्यांचे किती पगार आहेत?
शिक्षक शिक्षकच असावा
तो 'सहाय्यक शिक्षक' नको
शिकवायला तरी वेळ द्या
टपालांची आवक-जावक नको
लाट लाट लाटले तरी
शिक्षणाचा धंदा तोट्यात असतो
कुठे वर्ग उघड्यावर तर
कुठे गुरांच्या गोठ्यात असतो
बांधकाम, जनगणना, निवडणुकीचे
शिक्षकास सक्तीचे आदेश आहेत
सरकारी शाळा बुडवणे हाच
सत्ताधाऱ्यांचा उद्देश आहे
विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर
दुसरेच पोसायला लागले
'आचाऱ्याची' नवी भूमिका
'गुरु'जी सोसायला लागले.
'एक ना धड भाराभार चिंध्या'
नको त्याचा ऊत आहे
'परीक्षा नको, नोंदी ठेवा'
हे नवीनच भूत आहे.
विद्यार्थी आधारकार्ड- बँकखाते
शाळासिद्धी बंधनकारक आहे
नवनवीन अशैक्षणिक कामे
शाळा गुणवत्तावाढीस मारक आहे
ग्रामशिक्षण समितीला व्यवस्थापन
समितीचा चेक आहे
तरीही शालेय कामकाजात
राजकारणाचीच मेख आहे
शिक्षण हक्क कायद्याचे
हेच शैक्षणिक फलित आहे
ज्यांना हवे होते त्यांना
आयतेच कोलीत आहे
शिक्षणाच्या हक्काचे नाते
कर्तव्याशी जोडले पाहिजे
राजकारणाला शिक्षणाच्या
मुळापासून तोडले पाहिजे