बाप माझा
बाप माझा
बांधावर बसून कधी, सरींची वाट पाहात असायचा।
सर आलीच नाही धावून, म्हणून खूप संतापायचा।।
पावसाचा थेंब नाही, पण डोळ्यात मात्र पाऊस होता।
अन् भर उन्हात बाप मात्र, ओलाचिंब झाला होता।।
पावसानं मारली दडी, म्हणून विकली बैलजोडी।
घरातले रोजगार हमीवर सर्व, रोज फोडायचे खडी।।
पाटी नाही पेन्सिल पुस्तक तरी, बाप शाळेत धाडायचा।
मोकळाच येतो शाळेत म्हणून, मास्तर रोज मारायचा।।
कसंबसं शिकलो शाळा, राहिलो याच्या त्याच्या घरी।
अन् कितीही काम केलं तरी, रोजचीच उपासमारी।।
जावं वाटलं घर सोडून, अन् करावी म्हटलं चाकरी।
गाठलं कल्याण बदलापूर, अन् धरली मुंबईत नोकरी।।
रमलो बीएमसीच्या शाळेत, अन् झालो सन्मानित।
फुलत गेला संसार पण, राहिलो झोपडपट्टी चाळीत।।
सुचत गेलं काहीबाही, अन् लिहून काढल वहीत।
त्याचंच होईल पुस्तक माझं, हे मलाच नव्हतं माहीत।।
लेखणीलाही आली धार, अन् झाली शब्दांची दाटी।।
लिहिलेलं वाचतावाचता, कविता झाली किती मोठी।।
गोडी लागली शब्दांची अन् लयदार भाषा अलंकारांची।
रचनाही सुंदर सुचत गेल्या, अन् गाणी झाली शब्दांची।।
आजही आठवते अजून मला ती पहिली ढग कविता।
त्यातून झरत गेल्या माझ्या, पाऊसधारांच्या कविता।।
वेदनाही कळू लागल्या मला, माणसातल्या मनाच्या।
मन पावसाळ्यातही रमू लागलं, थेंबाथेंबात शब्दांच्या।।
आता काहूर माजलं फार, मनातल्या स्मृती जाग्या झाल्या।
अन् इवलेशा रोपालाही, मग लहान मोठ्या कळ्या आल्या।।